जळगाव (प्रतिनिधी) मराठी भाषेतील उत्कृष्ट वाड्.मय निर्मितीसाठी प्रकाशन वर्ष २०२० करिता राज्य शासनाच्यावतीने देण्यात येणाऱ्या स्व.यशवंतराव चव्हाण राज्य वाड्.मय पुरस्कारांसाठीच्या प्रवेशिका जिल्हाधिकारी कार्यालयात (मुंबई शहर व मुंबई उपनगर हे दोन जिल्हे वगळून), तसेच महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या कार्यालयात ३ मार्च, २०२१ पर्यंत पाठविता येणार आहेत.
१ जानेवारी, २०२० ते ३१ डिसेंबर, २०२० या कालावधीत प्रकाशित झालेली प्रथम आवृत्ती पुस्तके या स्पर्धेसाठी पात्र आहेत. या स्पर्धेची नियमावली व प्रवेशिका सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, रवींद्र नाट्य मंदिर इमारत, दुसरा मजला, सयानी रोड, प्रभादेवी, मुंबई ४०० ०२५ यांच्या कार्यालयात तसेच मुंबई शहर व मुंबई उपनगर हे दोन जिल्हे वगळता अन्यत्र संबंधित जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात (सर्वसाधारण शाखा अथवा करमणूक शाखा) विनामूल्य उपलब्ध होतील. महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या वेबसाईटवर नवीन संदेश या सदरात “स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाड्.मय पुरस्कार २०२० नियमावली व प्रवेशिका या शीर्षाखाली व “ What’s new” या सदरात “Late Yashwantrao Chavan State Literature Award २०२० Rules Book and Application Form” या शीर्षाखाली व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या http://sahitya.marathi.gov.in या संकेतस्थळावर प्रवेशिका व नियमपुस्तिका उपलब्ध होतील.
प्रवेशिका पूर्णत: भरुन आवश्यक साहित्यासह सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या कार्यालयात ३ मार्च, २०२१ पर्यंत पोहचतील अशा बेताने पाठवाव्यात. लेखक/प्रकाशक या स्पर्धेसाठी प्रवेशिका दाखल करु शकतात. मुंबई शहर व मुंबई उपनगर या दोन जिल्ह्यातील लेखक/ प्रकाशकांनी पुस्तकांच्या दोन प्रतींसह विहित नमुन्यातील प्रवेशिका सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, रवींद्र नाटय मंदिर इमारत, दुसरा मजला, सयानी रोड, प्रभादेवी, मुंबई ४०० ०२५ येथे पाठवाव्यात. मुंबई शहर व मुंबई उपनगर हे दोन जिल्हे वगळून अन्य ठिकाणच्या लेखक/प्रकाशकांनी संबंधित जिल्ह्यांच्या जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये हे साहित्य ३ मार्च, २०२१ पर्यंत पाठवावे. असे आवाहन सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ यांनी केले आहे.
लेखक/प्रकाशकांनी मंडळाकडे प्रवेशिका व पुस्तके पाठविताना सदर बंद लिफाफ्यावर/पाकीटावर “स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाड्.मय पुरस्कार, २०२० साठी प्रवेशिका” असा स्पष्ट उल्लेख करावा. प्रवेशिका व पुस्तके स्वीकारण्याचा अंतिम दिनांक ३ मार्च, २०२१ हा राहील. विहित कालमर्यादेनंतर येणाऱ्या प्रवेशिका स्पर्धेसाठी स्वीकारल्या जाणार नाहीत. असे महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.