जळगाव (प्रतिनिधी) भारतातील दारिद्रय रेषेखालील व दारिद्रय रेषेवरील अनेक गर्भवती महिलांना गरोदरपणाच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत मजूरीसाठी काम करावे लागते. यामुळे अशा गर्भवती महिला व माता कुपोषित राहून त्यांचे व त्यांच्या नवजात बालकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. मातामृत्यु व बालमृत्यु दरात घट होऊन तो नियंत्रित राहावा, यासाठी केंद्र शासनाच्या महिला व बालविकास मंत्रालयाने प्रधानमंत्री मातृ वंदना योजना संपूर्ण देशात दि. १ जानेवारी २०१७ पासून कार्यान्वित केलेली आहे.
राज्यातील प्रथमत: गर्भवती महिला व स्तनदा माता, ज्यांची गर्भधारणा १ जानेवारी, २०१७ रोजी अथवा तद्नंतर झाली असेल. अशा पात्र महिलांना प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेचा लाभ पहिल्या जीवीत अपत्यासाठी दिला जात आहे. या योजनंतर्गत ३ टप्प्यांमध्ये पाच हजारांचे अनुदान दिले जाते. पहिल्या हप्त्यासाठी संबंधित लाभार्थ्याला मासिकपाळीच्या शेवटच्या तारखेपासून १५० दिवसाच्या आत गर्भधारणा नोंदणी करणे आवश्यक आहे. दुसरा हप्ता गर्भधारणेच्या सहा महिन्यानंतर प्रसूतिपूर्व तपासणी केल्यास आणि तिसरा हप्ता प्रसूतीनंतर झालेल्या अपत्याची जन्मनोंदणी व बालकास बीसीजी पासुन गोवर, रुबेलापर्यंतचे संपुर्ण लसीकरण व त्या अनुषंगिक लसीकरणाचा पहिला खुराक दिल्यानंतर लाभार्थीच्या आधारलिंक बॅक खात्यात लाभ जमा केला जातो. या योजनेंतर्गत आतापर्यंत जळगाव जिल्ह्यातील ६५ हजार ३ पात्र महिला लाभार्थ्यांनी तब्बल २७ कोटी ३१ लाख २३ हजारांचे अनुदान ऑनलाईन DBT व्दारे वितरीत करण्यात आले आहे. उर्वरीत लाभार्थ्यांचे उद्दिष्ट्य पूर्ण करण्यासाठी त्याबाबत तालुका व शहरी भागातील आरोग्य संस्थानिहाय संबंधीत तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी तसेच तालुका समुह संघटक, आशा, गट प्रवर्तक कर्मचाऱ्यांना सुचना देण्यात आलेल्या आहेत.
जिल्ह्यातील पात्र प्रथम खेपेच्या गरोदर मातांनी आरोग्य विभागातील आशा कर्मचाऱ्यांकडे त्वरीत नोंदणी करावी. असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, जळगाव शहर महानगरपालिका आयुक्त सतीश कुलकर्णी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भीमाशंकर जमादार, जिल्हा माता व बाल संगोपण अधिकारी डॉ. समाधान वाघ, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, वैदयकीय आरोग्य अधिकारी डॉ. राम रावलानी, मनपा, जळगाव यांनी केले आहे.