भुसावळ (प्रतिनिधी) महिलेची फसवणूक करून गाळे खरेदीस टाळाटाळ केल्याप्रकरणी महिलेचे ६० लाख ७० हजार रूपये अदा करावेत. त्यानंतरच जामीनसाठी अर्ज करावा, असे सुप्रीम कोर्टाने भुसावळचे माजी प्रभारी नगराध्यक्ष अनिल चौधरीला सुनावले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, भुसावळ येथील महिलेची ६० लाख ७० हजार रुपये आरटीजीएसद्वारे घेऊन गाळे खरेदी करून न देता फसवणूक केल्याप्रकरणी भुसावळ येथील माजी प्रभारी नगराध्यक्ष अनिल छबिलदास चौधरी यांचेवर बाजारपेठ पोलीस स्टेशन येथे कलम ४२०, ५०४ व ५०६ अन्वये गुन्हा दाखल झालेला होता. या गुन्ह्यात अटक टाळण्यासाठी चौधरी यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात अटकपूर्व जामीनसाठी अर्ज दाखल केला होता. दि. २६ एप्रिल रोजी न्यायमूर्ती मंगेश पाटील यांच्या न्यायासनासमोर झालेल्या सुनावणीत चौधरी यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता.
त्यानंतर अनिल चौधरी यांनी अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. या प्रकरणी दि. २१ मे रोजी सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीत न्यायालयाने स्पष्ट मत नोंदवले की, सदर प्रकरणात असलेली वस्तुस्थिती व उच्च न्यायालयाने नोंदवलेले निरीक्षण पाहता तुम्ही आधी १९ ऑक्टोबर २०१९ रोजी घेतलेली संपूर्ण रक्कम ६० लाख ७० हजार रुपये संबंधित दिवाणी न्यायालयात दि. २४ मे पर्यंत जमा करा. त्यानंतरच तुमच्या जामीन अर्जावर विचार करु अन्यथा हा अर्ज रद्द करण्यात येईल. त्यामुळे आता अनिल चौधरींनी घेतलेली व्यवहारातील मूळ रक्कम ते संबंधित दिवाणी न्यायालयात भरतात किंवा कसे ? यावर सर्वांचे लक्ष लागून राहिलेले आहे. जर त्यांनी पैसे भरल्यास संबंधित जामीन अर्जावर दिनांक २५ मे रोजी सुनावणी होईल असे न्यायालयाच्या निकालपत्रात नमूद केले आहे. यामुळे आज ते पैसे भरणार का ? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.