मुंबई (वृत्तसंस्था) भाजपकडे बहुमत असतानाही भाजपने मुख्यमंत्रीपद एकनाथ शिंदे यांना दिलं. त्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर पसरलाय. तर दुसरीकडे ब्राम्हण महासंघाने भाजपच्या नेतृत्वावर टीका केली आहे. फडणवीस हे ब्राम्हण असल्यामुळे त्यांना मुख्यमंत्री होऊ दिलं नाही अशी टीका ब्राम्हण महासंघाने केली आहे.
राज्यात संपूर्ण बहुमत असून देखील देवेंद्र फडणवीस यांना सत्तेपासून दूर ठेवलं गेलं.” असा आरोप ब्राह्मण महसंघाचे अध्यक्ष डॉ. गोविंद कुलकर्णी यांनी केला आहे. भाजप जाणून बुजून ब्राह्मण समाजाचं खच्चीकरण करत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे. नितीन गडकरी यांच्यासोबत देखील भाजपने मुद्दाम असाच खेळ केला आणि फडणवीस यांच्यासोबतही असाच खेळ केला आहे. फडणवीस केवळ ब्राह्मण असल्यानेच भाजपने त्यांना मुख्यमंत्री होऊ दिलं नाही असा आरोप केला जात आहे.
राजकीय कौशल्य दाखवत देवेंद्र फडणवीस यांनी भाजपाला सत्तेच्या दारापर्यंत आणलं आणि आपल्या मनाचा मोठेपणा दाखवत माननीय एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद दिलं आणि आपण सरकारला बाहेरून पाठिंबा देणार असल्याचं सांगितलं. पण केंद्रातील नेतृत्वाने त्यांना बळजबरीने उपमुख्यमंत्रीपदावर विराजमान व्हायला सांगितलं आणि त्यांच खच्चीकरण केलं आहे. त्यामुळे ब्राह्मण महासंघ भाजपचा तीव्र शब्दांत निषेध करत आहे असं ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष डॉ. गोविंद कुलकर्णी यांनी सांगितलं आहे.
















