धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना आता रोहिणी नक्षत्र लागल्यामुळे कापूस बियाणे व ईतर बी-बियाणे लागवडीसाठी नामांकित कंपन्यांच्या बियाणे खरेदी करता वणवण भटकावे लागत आहे. कापूस संकरित वाणाचे नामांकित बियाणे लागवडीसाठी मिळत नसल्याने व बाजारात योग्यसाठा उपलब्ध नसल्याने तसेच दुकानावर कमी उपलब्ध असल्याने ते मिळणं कठीण झाले आहे. त्यामुळे याची चौकशी करुन शेतकऱ्यांना बियाणे उपलब्ध करुन द्यावे, अशी मागणी शेतकरी सेनेचे तालुका प्रमुख विनायक महाजन यांनी केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, काही ठिकाणी शेतकऱ्यांची दिशाभूल करत एकास एक असं बियाणे खरेदी कराल तर नामांकित कंपन्यांच्या बियाणे मिळेल, असे सांगितले. त्यामुळे शेतकऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. पैसे देऊन नामांकित कंपनीचे कापुस बियाणे मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. प्रशासनाने या संदर्भात त्वरित चौकशी करून शेतकऱ्यांना योग्य भावात मिळेल, अशी व्यवस्था करून शेतकऱ्यांना योग्य तो न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी शेतकरी सेनेचे तालुका प्रमुख विनायक महाजन यांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रति तालुका कृषी अधिकारी तसेच तहसील कार्यालय व जिल्हाधिकारी, कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.