नाशिक (वृत्तसंस्था) ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ व साहित्यिक डॉ. जयंत नारळीकर यांची निवड करण्यात आली आहे. नारळीकर यांच्या नावाची अधिकृतपणे घोषणा आज नाशिकमध्ये करण्यात आली. साहित्य महामंडळाचे साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिक ठाले पाटील यांनी याबाबत घोषणा केली. ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाशिकमध्ये २६, २७, २८ मार्चला होणार आहे.
९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाशिक नगरीत २६ ते २८ मार्च दरम्यान होत आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या संलग्न व घटन संस्था प्रतिनिधींच्या बैठकीत आज (रविवार) अध्यक्षपदाबाबतचा निर्णय घेण्यात आला. नाशिक की दिल्ली या संमेलन स्थळावरून मध्यंतरी बरीच रस्सीखेच झाली होती. नारळीकर यांच्या रुपाने पहिल्यांदाच विज्ञान लेखकाला साहित्य संमेलानाच्या अध्यक्षपदाचा मान मिळाला आहे. साहित्य महामंडळाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नाशिकमध्ये आज जवळपास तीन तास पार पडलेल्या बैठकीत नारळीकरांच्या नावावर अखेर एकमत झाले. साहित्य मंडळ अध्यक्ष कौतिक ठाले पाटील, मावळते अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रेटो यांच्या सह इतर पदाधिकारी बैठकीला हजर होते. अध्यक्षपदासाठी ९ दावेदारांच्या नावाची चर्चा होती. साहित्यिक भारत सासणे, जयंत नारळीकर, रामचंद्र देखणे, जनार्दन वाघमारे, तारा भवाळकर, अनिल अवचट, रवींद्र शोभणे, मनोहर शहाणे, गणेश देवी यांची नाव अध्यक्षपदासाठी चर्चेत होती.
कोरोनामुळे यावर्षीचं साहित्य संमेलन होणार की नाही, झालं तरी कुठे आणि कसं होणार याविषयी अनेक चर्चा होत्या. कोरोनाचं संकट येण्यापूर्वीच परभणी जिल्ह्यातील सेलू, जळगाव जिल्ह्यातील अमळनेर, नाशिक आणि पुण्याच्या सरहद संस्थेकडून राजधानी नवी दिल्लीत संमेलन घेण्याविषयीचे प्रस्ताव महामंडळाकडे आले होते. नंतर नाशिकमध्ये यावर्षीचं साहित्य संमेलन भरवण्याचा निर्णय घेण्यात आला. नाशिकच्या लोकहितवादी संस्थेकडे साहित्य संमेलनाचं आयोजकत्व देण्यात आलं आहे. अखेरीस नाशिकच्या प्रस्तावावर साहित्य महामंडळाने शिक्कामोर्तब केले.