मुंबई (वृत्तसंस्था) ‘आशा’ सेविका लढवय्या आणि वीरांगणा आहेत. कोरोनाची संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी त्यांची भूमिका महत्वाची आहे. त्यामुळे कोरोनाकाळात त्यांनी केलेल्या कामाबद्दल त्यांना मानाचा मुजरा करतो, अशी भावना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली.
“अजूनही कोरोना संकट गेलेलं नाही. संकट टळलेलं नसलं तरी ते नियंत्रणात आणू शकतो असं चित्र निर्माण झालं आहे. राज्यात जे काम आपण करत आहोत त्याची आश्चर्यकारकरित्या देशात आणि परदेशात प्रशंसा होत आहे. कौतुक होत असताना महाराष्ट्र आणि मुख्यमंत्री यांचं कौतुक होतं. पण मी काहीच केलेलं नाही मी फक्त निमित्तमात्र असून कर्ते करवते तुम्ही आहात,” असं सांगताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आशा शब्दाला साजेसं काम आपण करत आहात असं कौतुक केलं.
‘आपल्या व्यथांवर मार्ग काढण्यासाठी थोडी मुभा द्या’
सरकार येण्याआधी आशा आणि अंगणवाडी सेविकांना काढलेल्या मोर्चाची आठवण करुन देत उद्धव ठाकरेंनी यावेळी मदतीचं आश्वासन दिलं. “सरकारच्या कारकिर्दीची सुरुवात केल्यानंतर बळीराजाकडे आधी लक्ष दिलं. तुमच्या आशा, अपेक्षांकडे लक्ष देणार तितक्यात कोविड संकट आलं. पण तुम्हाला विसरलो आहोत असं समजू नका. आपले ऋण विसणार नाही. परतफेड करणं शक्य नसलं तरी तुमच्या वेदनांची दखल घेतली आहे. त्यावर मी नक्कीच मार्ग काढणार असून त्यासाठी थोडा अवधी लागेल. सरकारला थोडी मुभा द्या,” अशी विनंती उद्धव ठाकरेंनी केली
“दुसरी लाट आल्यानंतर तिसऱ्या लाटेचा धोका लहान मुलांना आहे. तिथं तुमचं काम अधिक आहे. आतापर्यंतही तुम्ही खूप काम केलं आहे. घरोघरी जाऊन पाहणी, तपासणी केली आहे. तुम्ही सर्वांनी महाराष्ट्राला कुटुंब म्हणून तळाहाताच्या फोडासारखं जपलं आहे. तेच हात तिसरी लाट थोपवताना हवी आहे,” असं उद्धव ठाकरेंनी यावेळी सांगितलं.