जामनेर (प्रतिनिधी) शेतीच्या मोबदल्याच्या वादातून एकावर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी तिघांविरुद्ध पहूर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात अधिक असे की, लताबाई प्रकाश कोळी (वय ५०, रा. गोद्री ता. जामनेर) यांचे आजळ सासरे मोतीराम कोळी हे मयत झाले आहेत. त्यांच्या नावे असलेली शेत जमिन ही गोद्री धरणात गेल्यामुळे त्याचा मोबदला वारसदार प्रकाश कोळी, ओंकार कोळी, सुपडु कोळी, दयाराम कोळी यांना नियमानुसार मिळणे अपेक्षित होता. परंतू संशयित आरोपी सुपडु कोळी यानेच लाभ घेतला. या कारणावरुन तसेच घराच्या भिंतीला टांगलेल्या लोखंडी पाईपाबाबत लताबाई कोळी यांनी संशयित आरोपीतांना विचारणा केल्याचे वाईट वाटल्याने त्यांनी लताबाई कोळी यांच्या मुलगा योगेश प्रकाश कोळी यास जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने त्याच्या डोक्यात लाकडी घडोशीचे पायाने मारुन गंभीर दुखापत केली. तसेच लताबाई यांना देखील लाथाबुक्क्यांनी व लाकडी काठीने मारहाण करुन डोक्याचे केस ओढून शिवीगाळ, दमदाटी केली. याप्रकरणी सुपडू सीताराम कोळी, तुकाराम सुपडू कोळी, यशोदाबाई सुपडू कोळी (सर्व रा. गोद्री ता. जामनेर) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास संदीप चेडे हे करीत आहे.