जयपूर (वृत्तसंस्था) आरटीआय कार्यकर्त्यावर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना राजस्थानमधील बाड़मेर जिल्ह्यातील गिडा पोलीस स्टेशन परिसरात घडली आहे. आरटीआय कार्यकर्ते अमराराम गोदारा यांचे अपहरण करून अज्ञात हल्लेखोरांनी त्यांना बेदम मारहाण करून बेवारस अवस्थेत रस्त्याच्या कडेला फेकून पलायन केले. सध्या अमराराम यांना जोधपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती गंभीर आहे.
आरटीआय कार्यकर्ते अमराराम गोदारा यांनी दोन दिवसांपूर्वीच दारू माफियांविरोधात तक्रार केली होती. त्यानंतर पोलिसांनी अवैध दारु विक्रिविरोधात कारवाई केली. अवैध दारु विक्रिविरोधात अमराराम गोदरा सातत्याने पोलिसांना माहिती देत होते. याशिवाय त्यांनी पंचायत राज विभागातही दारु माफियांविरोधात तक्रार करुन कारवाईची मागणी केली होती. यामुळे संतापलेल्या दारु माफियांनी अमराराम गोदारा यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. पश्चिम राजस्थानच्या बारमेर जिल्ह्यातील गिडा पोलीस स्टेशन परिसरात, आरटीआय कार्यकर्ता अमरराम यांचं अपहरण करून त्यांना जबर मारहाण करण्यात आली. हल्लेखोरांनी निदर्यतेच्या सर्व सीमा पार केल्या. हल्लेखोरांनी अमराराम यांच्या पायात खिळे ठोकले, त्यानंतर त्यांचे हातपाय तोडून गावाजवळील रस्त्याच्या कडेला फेकून दिले.
अमरराम यांची प्रकृती गंभीर असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पोलिसांना दिलेल्या जबाबात त्यांनी काही लोकांनी आपलं अपहरण करत मारहाण केल्याची माहिती दिली. दरम्यान, हल्ला होण्याच्या एक दिवस आधीच आरटीआय कार्यकर्ते अमराराम यांनी फेसबुकवर एक पोस्ट लिहिली होती. यात त्यांनी आपल्याला धमक्या येत असल्याचं म्हटलं होतं. याबाबत आपण पोलिसांनाही कळवले आहे, मी शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहीन, असं त्यांनी यात म्हटलं होतं.
हल्लेखोरांवर गंभीर गुन्हे दाखल
याशिवाय पोलीस अधीक्षक दीपक भार्गव सांगतात की, त्यांना घटनेची माहिती मिळताच आरटीआय कार्यकर्ते अमराराम यांना उपचारासाठी नेण्यात आले असून त्यांच्यावर पोलिसांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. त्याच वेळी भार्गवच्या म्हणण्यानुसार, हल्लेखोर पकडण्यासाठी पोलिसांनी चार पथके तयार केली आहेत आणि त्यांच्यावर अनेक गंभीर कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
सध्या पोलीस हल्लेखोराांचा शोध घेत आहेत. त्याचवेळी राजस्थान राज्य मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष गोपाल कृष्ण व्यास यांनी राजस्थानचे पोलीस महासंचालक, उत्पादन शुल्क आयुक्त उदयपूर, बाडमेरचे जिल्हाधिकारी आणि एसपी यांना नोटीस बजावली असून या संपूर्ण प्रकरणाचा तथ्यात्मक अहवाल मागवला आहे.
















