चेन्नई (वृत्तसंस्था) तामिळनाडूच्या विरुधुनगर येथे एका फटाक्यांच्या कारखान्यात मोठा स्फोट झाला आहे. या स्फोटात ११ जणांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. या स्फोटामुळे कारखान्यात भीषण आग लागली आहे. या दुर्घटनेतील जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या १० गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.
तामिळनाडूत फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट होऊ लागलेल्या आगीत होरपळून ११ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. खासगी कारखान्यात फटाके तयार करण्यासाठी काही केमिकल्सचं मिश्रण केलं जात असताना ही दुर्घटना झाल्याची माहिती समोर आली आहे. स्फोट होताच अग्निशमन दलाच्या १० गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. पण केमिकल्समुळे आग विझवण्यात त्यांना अडचण येत होती. प्राथमिक तपासात कारखान्यात नियमांचं पालन केलं जात नसल्याने आग लागली असल्याची शक्यता आहे. याप्रकरणी सध्या तपास सुरु आहे. दरम्यान, या घटनेत जीव गमावलेल्यांच्या कुटुंबियांना ३ लाखांची आर्थिक मदत करणार असल्याची घोषणा तामिळनाडूचे मुख्यमंत्री पलानीसामी यांनी केली आहे. त्याचबरोबर जखमींना प्रत्येकी १ लाखांचे आर्थिक साहाय्य दिलं जाणार आहे.
या घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केलं आहे. त्यांनी मृतकांच्या कुटुंबियांना २ लाखांची मदत देणार असल्याची घोषणा केली आहे. तर जखमींना ५० हजारांची मदत जाहीर करण्यात आली असल्याची माहिती पंतप्रधानांनी दिली आहे. ‘तामिळनाडूच्या विरुधुनगर येथे फटाक्यांच्या कारखान्यात आग लागल्याची घटना दुखद आहे. या दुखद समयी पीडित परिवारांसोबत माझ्या संवेदना आहेत. जखमी लोक बरे होतील, अशी मला आशा आहे. घटनास्थळी सध्या बचावकार्य सुरु आहे’, असं पंतप्रधान मोदी ट्विटरवर म्हणाले आहेत