नवी दिल्ली (वृत्तसंस्था) अफगाणिस्तानमध्ये हिंदुस्थानी पत्रकार दानिश सिद्दीकीची १६ जुलै रोजी तालिबानी दहशतवाद्यांनी गोळ्या घालून हत्या केली. मात्र आता या हत्येबाबत आणखी एक भयंकर माहिती समोर आली आहे. दानिश यांना गोळ्या घालून त्यांची हत्या केल्यानंतर त्यांच्या डोक्यावर तालिबान्यांनी गाडी चढवली.
अफगाणी कमांडर बिलाल अहमद यांनी यांनी या संदर्भातली माहिती दिली आहे. तालिबाननं दानिशच्या मृतदेहासोबत कसं वाईट कृत्य केलं हे त्यांनी सांगितलं आहे. अहमद यांनी सांगितलं की, दानिश भारतीय होते आणि तालिबान भारताचा राग करतात म्हणून त्यांनी दानिशच्या मृतदेहाची विटंबना केली.
१६ जुलै रोजी दानिश सिद्दीकी यांचा मृत्यू झाला. अफगान सैन्य आणि तालिबान यांच्यादरम्यान झालेल्या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला असल्याचं सांगितलं जात आहे. अफगान सैन्यानं जेव्हा पाकिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या स्पिन बोल्दक शहरावरील बाजारपेठेवर पुन्हा नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांची तालिबानशी चकमक झाली. या चकमकीत एका अफगान अधिकाऱ्यासह दानिश सिद्दीकी यांचा मृत्यू झाला.
मात्र आता समोर आलेली माहिती त्याहून भयानक आहे. बिलाल अहमद गेल्या ५ वर्षांपासून अफगान सैन्यात तैनात आहेत. आता ते कमांडर पोस्टवर आहेत. त्यांनी सांगितलं, तालिबानच्या अतिरेक्यांनी सुरुवातीला दानिश सिद्दीकीला गोळी मारली. त्यात त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर अतिरेक्यांना समजलं की दानिश भारतीय आहेत. त्यामुळे त्यांनी दानिश यांच्या डोक्यावर गाडी चढवली. त्यांचा मृत्यू झाला आहे हे माहित असून अतिरेक्यांनी हे वाईट कृत्य केलं. तालिबान भारत आणि भारतीयांचा द्वेष करतात. यासाठी त्यांनी दानिश यांच्या मृतदेहाची विटंबना केली.
तालिबानने जबाबदारी नाकारली
तालिबानचा प्रवक्ता जबिउल्लाह मुजाहिद म्हणाला की, हिंदुस्थानी पत्रकार दानिश सिद्धिकीच्या मृत्यूप्रकरणी आम्हाला खेद आहे. आम्हाला कुठलीही माहिती न देता अनेक पत्रकार युद्धभुमीवर वार्तांकन करत आहेत. सिद्धिकीच्या मृत्यूला आम्ही जबाबदार नसून पत्रकारांनी युध्दभुमीवर येण्यापूर्वी आम्हाला सूचना द्यावी आम्ही तशी खबदारी घेऊ असेही मुजाहिदने म्हटले आहे.