रांची (वृत्तसंस्था) बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि आरजेडीचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. चारा घोटाळा प्रकरणाशी संबंधित चाईबासा ट्रेजरी प्रकरणात त्यांना आज जामीन मिळाला. परंतु, जामीन मंजूर झाला असला तरी ते तुरूंगातून बाहेर येऊ शकणार नाहीत.
चाईबासा ट्रेजरी प्रकरणात झारखंड हायकोर्टाने लालू प्रसाद यादव यांना जामीन मंजूर केला. ५० हजारांच्या दोन जातमुचलक्यांवर आणि २ लाख रुपये दंड भरावा लागणार आहे. लालूप्रसाद यादव यांच्या जामीनला सीबीआयच्या वकिलांनी विरोध केला. तरीही जामीन अर्ज कोर्टाने मंजूर केला आहे. लालू प्रसाद यांना अजूनही तुरुंगातच राहावे लागणार आहे. कारण दुमका ट्रेजरी प्रकरणाची सुनावणी सुरु अद्यापही आहे. याप्रकरणी त्यांनी जामीनासाठी अर्ज केला असून तो मंजूर झाल्यास ते तुरुंगाबाहेर येण्याची शक्यता आहे. दरम्यान, सुमारे ९५० कोटी रुपयांच्या चारा घोटाळा प्रकरणासह तीन वेगवेगळ्या केसमध्ये लालू प्रसाद यादव हे आरोपी आहेत. सप्टेंबर २०१३ मध्ये चारा घोटाळा प्रकरणी दोषी आढळल्यानंतर लालू प्रसाद यादव यांना अटक झाली होती. त्यानंतर २३ डिसेंबर २०१७ मध्ये लालू प्रसाद यादवांना चारा घोटाळ्याशी संबंधित आणखी एका प्रकरणात शिक्षा सुनावली गेली. त्यानंतरत्यांची रवानगी बिरसा मुंडा तुरुंगात करण्यात आली आहे.