धरणगाव (प्रतिनिधी) बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे हे मराठी साहित्याला पडलेलं एक गोड स्वप्न होतं. त्यांनी आपल्या कवितेतून निसर्गाचं लोभस वर्णन केलं आहे. त्यांची कविता ही मानवी मनाला भुरळ घालणारी होती असे प्रतिपादन डॉ. संजीवकुमार सोनवणे यांनी केले. ते साहित्य कला मंच आयोजित बालकवी जयंती समारंभात अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
पी. आर. हायस्कूलमध्ये झालेल्या कार्यक्रमात जयंतीनिमित्त बालकवींना आदरांजली अर्पण करण्यात आली. साहित्य कला मंच अध्यक्ष प्रा. बी. एन. चौधरी, सचिव डॉ. संजीवकुमार सोनवणे, माजी अध्यक्ष प्रभाकर नेरपगार व उपस्थित मान्यवरांनी बालकवींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. प्रा. चौधरी यांनी बालकवींच्या जीवन प्रवास आणि त्यांच्या कवितांचा परिचयात्मक मनोगत व्यक्त केले. बालकवींनी आपल्या जन्मभूमीत लिहिलेल्या औदुंबर, पारवा, श्रावणमास, फुलराणी या कवितांतील सौंदर्यस्थळे आजही धरणगावात असून, ती पाहण्यासाठी महाराष्ट्र भरातून रसिक येथे येतात हे त्यांनी सांगितले. साहित्य कला मंच बालकवींचे स्मारक उभारण्यासाठी प्रयत्न करत असून लवकरच ते पूर्णत्वास येईल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. बालकवींचे हे स्मारक मराठी साहित्य रसिकांना आणि नव्या लेखक, कवींना प्रेरणास्त्रोत बनेल. त्यातून बालकवींचे विचार समजतील, असे ते म्हणाले.
बालकवी पुरस्कारांचे लवकरच वितरण
प्रास्ताविक मंचचे कार्याध्यक्ष डी. एस. पाटील यांनी केले. साहित्य कला मंच आयोजित करत असलेल्या विविध उपक्रमांचा त्यांनी आढावा घेतला. यावर्षीचे बालकवी पुरस्कार देवा झिंजाड (पुणे) आणि राजेंद्र उगले (नाशिक) यांना लवकरच एका भव्य कार्यक्रमात वितरण करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंचचे उपाध्यक्ष बी. डी. शिरसाठ यांनी तर आभार प्रदर्शन जी. आर. सूर्यवंशी यांनी केले.