मुंबई (वृत्तसंस्था) पावसाने सध्या उघडीप दिली असली तरी पुन्हा दिवाळीमध्ये पाऊस पडणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तविला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे.
दक्षिण आणि पूर्व बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्याची शक्यता आहे. हा पट्टी निर्माण झाला तर २ ते १० नोव्हेंबर दरम्यान पाऊस पडण्याची शक्यता आहे. दरम्यान, कमी दाबाचा पट्टा अधिक तीव्र होण्याची शक्यता कमी आहे. तो पुढे सरकण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा पाऊस ६ ते ११ नोव्हेंबरदरम्यान पडले, अशी शक्यता आहे.
महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता
तर बंगालच्या उपसागरात श्रीलंकेच्या किनरपट्टीलगत कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्याचे संकेत आहेत. त्यामुळे दक्षिण भारतात काही ठिकाणी पाऊस सक्रिय असेल मात्र, महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. त्यामुळे दिवाळीच्या दिवसांत कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे. दरम्यान, मराठवाड्यातील किमान तापमान सरासरीप्रमाणे आहे. विदर्भात अमरावती, ब्रह्मपुरी, गोंदिया भागात किमान तापमान सरासरीच्या खाली असल्याने तेथे रात्रीचा गारवा जाणवत आहे.
हवेत अधिक गारवा जाणवणार
अनेक शेतक-यांची पिकं काढणीची लगबग सरु आहे. अशात पाऊस झाल्यास पिकांचं नुकसान होण्याची शक्यता आहे. नोव्हेंबर महिना असल्याने थंडीची चाहूल लागण्याची शक्यता आहे. त्यातच पाऊस झाला तर हवेत अधिक गारवा जाणवणार आहे. मध्य महाराष्ट्रात अहमदनगर, जळगाव वगळता सर्वत्र किमान तापमान सरासरीच्या जवळ आहे. कोकण विभागात मुंबई परिसरात ते सरासरीपेक्षा १ अंशांने अधिक आहे.