जळगाव (प्रतिनिधी) भाजपमधून राष्ट्रवादीत गेलेले माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी आपला धडका कायम ठेवला आहे. उत्तर महाराष्ट्रात खडसेंचा जोर अद्याप ओसरलेला दिसत नाही. कारण भुसावळ नगरपालिकेतील १३ नगरसेवकांनी भाजपला सोडचिठ्ठी देत खडसे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.
भुसावळमध्ये अलीकडे घडलेल्या घडामोडींचा आढावा घेतल्यास भाजपच्या चिंता वाढताना दिसत असली, तरी राष्ट्रवादीसाठीही पक्ष नेतृत्त्वाच्या दृष्टीने पक्षांतर्गत आव्हाने निर्माण करणाऱ्या आहेत, असेही सांगितले जात आहे. नगरपालिका निवडणुकीपूर्वी झालेला हा पक्षप्रवेश भाजपसाठी कठीण जाणार आहे, असेही म्हटले जात आहे. जळगाव जिल्ह्यात भाजपला बॅकफूटवर ढकलण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने सुरुवातीला एकनाथराव खडसेंच्या रुपाने मातब्बर नेत्याला आपल्या गळाला लावले. त्यानंतर आता खडसेंच्या माध्यमातून भुसावळातील १३ नगरसेवकांसह त्यांच्या समर्थकांना राष्ट्रवादीत प्रवेश देऊन, नगरपालिका निवडणुकीपूर्वीच राजकीय भूकंप घडवून आणला. जळगाव जिल्हा भाजपसाठी हा मोठा ‘सेटबॅक’ मानला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने केलेली खेळी ही भाजपच्या अडचणी वाढवणारी असून, जिल्ह्याच्या राजकारणावर दूरगामी परिणाम करणारी आहे. दुसरीकडे, भुसावळात अलिकडे घडलेल्या घडामोडी या भाजपच्या चिंता वाढवणाऱ्या असल्या तरी राष्ट्रवादीसाठीही पक्ष नेतृत्त्वाच्या दृष्टीने पक्षांतर्गत आव्हाने निर्माण करणाऱ्या आहेत.
भुसावळ नगरपालिकेतील भाजपच्या नगराध्यक्षांसह १३ नगरसेवक, त्यांचे कुटुंबीय आणि समर्थक अशा अर्धशतकी संख्या असलेल्या मंडळीनी, १४ फेब्रुवारीला राष्ट्रवादीचे घड्याळ आपल्या मनगटावर बांधले. त्यामुळे भाजप पुरता संकटात सापडला आहे. भुसावळ नगरपालिकेची निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. अशा परिस्थितीत पक्षाला बसलेला झटका हा निश्चितच आगामी निवडणुकीचा स्कोअर कमी करणारा ठरु शकतो. विशेष म्हणजे, भुसावळात भाजपला या झटक्यातून सावरावे तर लागेलच शिवाय राष्ट्रवादीला टक्कर देण्यासाठी सक्षम पर्याय देखील वेळीच उभा करावा लागणार आहे. यासाठी पक्षाकडे फार वेळ नाही. अशा परिस्थितीत भाजपच्या भूमिकेकडे लक्ष असेल.
भाजपला हद्दपार करायचं ठरवलंय
आता लोकांनीच भाजपला हद्दपार करण्याचे ठरवले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस परिसंवाद यात्रेच्या निमित्ताने त्याची प्रचिती आली. भुसावळ नगरपालिकेत भाजपची सत्ता आहे. पण गेल्या साडेचार वर्षांत शहराचा विकास तर सोडा मात्र, शहर अनेक वर्षे मागे पडले, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संतोष चौधरी यांनी केला.