मुंबई (वृत्तसंस्था) मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी अखेर भाई जगताप यांची वर्णी लागली आहे. तर चरणसिंह सपरा हे कार्यकारी अध्यक्ष म्हणून काम पाहतील. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते के.सी. वेणुगोपाल यांनी पत्रक काढत याबाबतची घोषणा केली आहे.
मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी विधान परिषदेचे आमदार भाई जगताप यांची निवड झाली आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी जगतापांच्या नावावर शिक्कामोर्तब केलंय. विद्यमान अध्यक्ष आणि माजी खासदार एकनाथ गायकवाड यांच्याविषयी पक्षांतर्गत नाराजी वाढल्याची चर्चा होती. त्यामुळे मुंबई काँग्रेसमध्ये खांदेपालट करण्यात आले. अखेर मुंबई काँग्रेस अध्यक्षपदी भाई जगताप यांची निवड झाली. मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या (BMC Election) पार्श्वभूमीवर मुंबई काँग्रेस अध्यक्षपदाच्या हालचालींना वेग आला होता. भाई जगताप यांच्यासह मनहास, चरणसिंग सपरा आणि नसीम खान हेदेखील अध्यक्षपदासाठी स्पर्धेत होते. मात्र मुंबई काँग्रेसचा आक्रमक चेहरा अशी ओळख असणाऱ्या भाई जगताप यांची अखेर अध्यक्षपदी निवड झाली आहे. भाई जगताप हे रस्त्यावरील आंदोलनांपासून ते टीव्ही डिबेटपर्यंत काँग्रेसची भूमिका ठामपणे मांडत असतात. मुंबई काँग्रेसमधील अनेक ज्येष्ठ आणि युवा नेत्यांशी त्यांचे चांगले संबंध आहेत. भाई जगताप यांच्या रुपाने काँग्रेसला मराठी चेहरा मिळाला आहे. तसंच पक्ष संघटनेत प्रदीर्घ अनुभव असणे ही भाई जगताप यांच्यासाठी जमेची बाजू असल्याचे सांगितले जाते. भाई जगताप यांच्यासाठी मिलिंद देवरा, अशोक चव्हाण हे आग्रही होते. त्यामुळे हायकमांडने त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याची चर्चा आहे.