मुंबई (वृत्तसंस्था) मराठा आरक्षणाबाबत महत्त्वाची माहिती मंत्री अशोक चव्हाण यांनी दिली आहे. येत्या ९ डिसेंबर रोजी मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. पाच सदस्यीय घटनापीठापुढे ही महत्त्वाची सुनावणी होत आहे. मराठा आरक्षण प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेली अंतरिम स्थगिती हटविण्याबाबत राज्य शासनाने केलेल्या अर्जावर ९ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजता ही सुनावणी होणार आहे.
मंत्रीमंडळाच्या मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी ट्विट करत ही महत्त्वाची माहिती दिली आहे. राज्य सरकारने यासाठी 4 वेळा सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींकडे अर्ज केला होता. त्यानंतर ही सुनावणी होत आहे. सुप्रीम कोर्टाच्या तीन सदस्यी खंडपीठाने ९ सप्टेंबर रोजी आपल्या आदेशात २०२०-२१ साठी नोकरभरती आणि शैक्षणिक प्रवेश प्रक्रियेतील मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीवर अंतरिम स्थगिती दिली होती आणि हे प्रकरण घटनापीठाकरे वर्ग केलं होतं. या निर्णयामुळे एसईबीसी प्रवर्गातील अनेक विद्यार्थी आणि उमेदवारांवर परिणाम झाला. समाजातील रोष वाढल्याने सरकारही अडचणीत सापडलं. त्यामुळे अंतरिम आदेश रद्द करण्याच्या सरकारच्या अर्जावर तातडीने सुनावणी आवश्यक असल्याची विनंती ज्येष्ठ विधीज्ञ मुकुल रोहतगी यांनी सर्वोच्च न्यायालयाला केली होती. अर्जावर लवकरात लवकर विचार केला जाईल, असं कोर्टाने सांगितलं नव्हतं. परंतु त्या संदर्भात कोणताही निर्णय झालेला नव्हता. अखेर सरकारच्या पाठपुराव्यानंतर पाच सदस्यीय घटनापीठाची स्थापना झाल्याचं अशोक चव्हाण यांनी सांगितलं.
अंतरिम स्थगितीनंतर राज्यातील मराठा समाज आक्रमक झाला होता. मराठा आंदोलकांच्या विरोधानंतर राज्य सरकारने एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली होती. त्यानंतर पोलीस मेगाभरतीसह तलाठीपदाच्या नियुक्त्या देखील रखडल्या आहेत. सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणाला स्थगित दिल्यामुळे मराठा समाज आक्रमक झाला आहे.
















