पालघर (वृत्तसंस्था) जिल्ह्याच्या वेशीवर असलेल्या ठाणे जिल्ह्यात बर्ड फ्लूने शिरकाव केल्यानंतर आता शेजारच्या पालघर जिल्ह्यातील वसई विरार भागातील पोल्ट्री सेंटरच्या कोंबड्यांमध्येही या संसर्गाची पुष्टी झाली आहे. पालघरचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत कांबळे यांनी ही माहिती दिली.
पालघरचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत कांबळे यांनी सांगितले की, “कुक्कुटपालन केंद्रातील (पोल्ट्री फार्म) काही कोंबड्या मृतावस्थेत आढळून आल्याने त्यांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.” ते म्हणाले की, ‘शुक्रवारी रात्री तपासाचे निकाल आले, ज्यामध्ये कोंबड्यांना H5N1 विषाणूची लागण झाल्याची पुष्टी झाली.’
मात्र कांबळे यांनी परिस्थिती गंभीर नसल्याचा दावा केला. पोल्ट्री फार्मच्या किती कोंबड्यांचा मृत्यू झाला हेही त्यांनी स्पष्ट केले नाही. इतर पक्ष्यांना संसर्ग होऊ नये यासाठी जिल्ह्यातील पशुसंवर्धन विभाग उपाययोजना करणार आहे. ते म्हणाले की,” केंद्रीय मत्स्यव्यवसाय आणि पशुसंवर्धन मंत्रालयाला येथील बर्ड फ्लूच्या प्रकरणांची माहिती देण्यात आली आहे.” या आठवड्याच्या सुरुवातीलाच ठाणे जिल्ह्यातील शाहपूर तालुक्यातील वेहोली गावातील एका पोल्ट्री फार्ममध्ये सुमारे 100 पक्ष्यांचा मृत्यू झाला होता, ज्यांचे नमुने बर्ड फ्लूसाठी तपासले गेले होते. यानंतर जिल्हा प्रशासनाने एक किलोमीटरच्या परिघात असलेल्या कुक्कुटपालन केंद्रातील सुमारे 25 हजार पक्षी मारण्याचे आदेश दिल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.