जळगाव (प्रतिनिधी) भाजपच्या नगरसेविका ज्योती बाळासाहेब चव्हाण बेपत्ता झाल्याची तक्रार त्यांचे पती बाळासाहेब चव्हाण यांनी रामानंदनगर पोलीस स्थानकात दाखल केली आहे. यामुळे पालिकेच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.
बाळासाहेब चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, सौ. ज्योती बाळासाहेब चव्हाण या काही नगरसेविकांसोबत दि. १४ मार्च रोजी रात्री नाशिक येथे रवाना झाल्या. यानंतर १५ मार्च रोजी दुपारी चार वाजता एका नगरसेविकेच्या मोबाईलवरून त्यांनी आपल्या कुटुंबाशी शेवटचा संपर्क साधला. यानंतर त्यांनी कुटुंबाशी संपर्क साधला नसल्यामुळे रामानंदनगर पोलीस स्थानकात मिसींगची तक्रार दाखल करण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे.
सध्या भाजप आणि भाजपमधील फुटीर नगरसेवकांचा गट हा अज्ञात ठिकाणी आहे. उद्या ऑनलाईन सभेत महापौर आणि उपमहापौर यांची निवड होणार असल्यामुळे अज्ञात ठिकाणी राहून सुध्दा मतदान करता येणार असल्याने दोन्ही बाजूंनी ही काळजी घेतली आहे. यातच आता भाजपच्या नगरसेविका ज्योती चव्हाण बेपत्ता झाल्याची तक्रार रामानंदनगर पोलीस स्थानकात दाखल केली आहे.