मुंबई (वृत्तसंस्था) ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणासाठी भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. ओबीसी आरक्षणासाठी भाजपने मंत्रालयावर काढलेला धडक मोर्चा भाजप कार्यालयातच पोलिसांनी रोखला आहे. याशिवाय भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, पक्षाचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आमदार गोपीचंद पडळकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
आंदोलकांनी मोर्चासाठी परवानगी घेतली नव्हती तसेच कायदा सुव्यवस्थेचे कारण देत पोलिसांनी चंद्रकांत पाटील, प्रवीण दरेकर, सुधीर मुनगंटीवर, गिरीश महाजन, गोपीचंद पडळकर यांच्यासह भाजप आंदोलकांना ताब्यात घेतले आहे. महिला आंदोलकांचीही धरपकड करण्यात आली आहे. सर्वांना आझाद मैदान पोलिस स्टेशनमध्ये नेले जात आहे. तेथे त्यांना काही वेळाने सोडून देणार असल्याची माहिती आहे. मात्र, पोलिसांच्या या धरपकडीनंतर भाजप नेत्यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली आहे.
मविआ सरकारलाच ओबीसींना आरक्षण द्यायचे नाही – चंद्रकांत पाटील
मराठा आरक्षणासह ओबीसी आरक्षणाकडे या सरकारने दुर्लक्ष केले. मविआ सरकारलाच ओबीसींना आरक्षण द्यायचे नाही, असा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला. पोलिसांच्या दबावतंत्राचा वापर करून सरकार हे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, ओबीसी आरक्षणासाठी आम्ही मंत्रालयात धडकूच, असे चंद्रकांत पाटील म्हणाले. पवार साहेबांनी लोकांना गूळ दाखवणे आणि फसवणे याची मोठी परंपरा आहे. त्यामुळे त्यांच्या गूळ दाखवण्याला ओबीसी समाज भीक घालणार आहे. महाविकास आघाडी आरक्षण देणार नाही हे जनतेला समजले असून ओबीसी समाज आता संतप्त झाला आहे, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.
सरकारचे डोळे उघडण्यासाठी आम्ही हे आंदोलन करत आहोत – प्रवीण दरेकर
तर, आंदोलनासाठी परवानगी घेतली की नाही हा महत्त्वाचा मुद्दा नाही. सरकारकडून ओबीसींच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे सरकारचे डोळे उघडण्यासाठी आम्ही हे आंदोलन करत आहोत, असे प्रवीण दरेकर म्हणाले. मध्य प्रदेशने ज्याप्रमाणे ओबीसींना आरक्षण मिळवून दिले, त्याप्रमाणे महाराष्ट्राने प्रयत्न का केले नाही, असा सवालही त्यांनी केला.
आंदोलकांना ताब्यात घेत सरकारने दडपशाही सुरू केली आहे – पडळकर
ओबीसींना आरक्षण मिळू नये, असाच सरकारचा हेतू दिसतो. आज आंदोलकांना ताब्यात घेत सरकारने दडपशाही सुरू केली आहे, असा आरोप गोपीचंद पडळकर यांनी केला.