धरणगाव (प्रतिनिधी) शहरात १३ दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. याबाबत पालिका प्रशासन निष्प्रभ ठरल्याचा आरोप करत भाजपचे माजी तालुकाध्यक्ष अॅड. संजय महाजन व शहराध्यक्ष दिलीप महाजन यांनी अनियमित पाणीपुरवठ्याच्या विरोधात भव्य मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे.
धरणगाव शहरातील पाणी टंचाई आजची परिस्थिती नसून कित्येक वर्षापासून आहे. धरणगावकरांना पाण्याचे राजकारण नवीन नाही. असे असून देखील शहरात नागरिकांना तब्बल १३ दिवसानंतर पाणी पाणीपुरवठा होत आहे. शहरातील काही भागात तर भर हिवाळ्यात टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरु होता. यावरूनही राजकीय वाद उफाळून आला होता. सोशल मिडीयावर नगराध्यक्ष निलेश चौधरी आणि भाजपचे नगरसेवक ललित येवले यांच्यात कलगीतुरा रंगला होता. तर दुसरीकडे पाणी पुरवठ्यावरून धरणगावातील नागरिकांमध्ये प्रचंड जनआक्रोश निर्माण झाला आहे. शहरात १३ दिवसाआड पाणीपुरवठा होत असल्यामुळे गावातील नागरिकांमध्ये तीव्र प्रतिक्रिया आहेत. त्यामुळे गावाच्या नागरिकांच्या हितासाठी भाजपने भव्य मोर्चा काढण्याचे भाजपने ठरविले आहे. या मोर्च्याच्या नियोजनासाठी आज सायंकाळी भाजपची बैठक होत आहे. या बैठकीत मोर्च्याची तारीख आणि वेळ ठरविणार असल्याचे भाजपचे माजी तालुकाध्यक्ष संजय महाजन व शहराध्यक्ष दिलीप माळी यांनी कळविले आहे. दरम्यान, महिन्यातून अवघ्या दोन वेळेस पाणीपुरवठा करणाऱ्या पालिका प्रशासनाचा आणि सत्ताधाऱ्यांचा संजय महाजन यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. सत्ताधाऱ्यांना नागरी समस्या सोडून पालिकेत भ्रष्टाचार करण्यात जास्त रस आहे. अवघ्या एका वर्षात १३ ते १५ कोटीचा भ्रष्टाचार ज्या पालिकेत होतो. त्या पालिकेतील सत्ताधाऱ्यांकडून काय अपेक्षा करावी?. थोडीही नैतिकता उरली असेल तर सत्ताधाऱ्यांनी राजीनामा द्यावा, भाजप अवघ्या काही दिवसात पाणीपुरवठा सुरळीत करून दाखवेल, असे आव्हान देखील श्री. अॅड.महाजन यांनी दिले आहे.