मुंबई (वृत्तसंस्था) : अमित शहा आपण असेच बोलत राहा, मऱ्हाठा नक्की उठेल, असा सल्ला शिवसेनेने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना दिला आहे. शिवसेनेचे मुखपत्र सामनातून भाजपवर हल्लाबोल करण्यात आला आहे. गणेशोत्सवादरम्यान अमित शहा मुंबई दौऱ्यावर होते.
त्यादरम्यान त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना जामीन दाखवण्याची भाषा केल्यानंतर आता शिवसेना आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. “शिवसेनेला गाडण्याची व उद्धव ठाकरे यांना धडा शिकविण्याची भाषा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केली. आता मुंबईवर ताबा मिळवायचाच. आता नाही तर कधीच नाही, असेही ते म्हणाले. शिवसेना फोडली कशासाठी? त्या विषालाच यानिमित्ताने उकळी फुटली. भाजपमध्ये एखादा चिंतामणराव देशमुख निर्माण होणे नाही, पण शिंदे गटाने तर सुंताच करून घेतली! मात्र अमित शहा यांनी हे असे बोलत राहावे. मऱ्हाठा नक्की उठेल!”, असे म्हणत शिवसेनेने टीका केली आहे.
धडा शिकवावा लागेल
अमित शहा पाच सप्टेंबर रोजी मुंबईतल्या लालबाग राजाच्या दर्शनासाठी आले होते. त्यादरम्यान त्यांनी भाजप कार्यकर्त्यांची बैठक घेतली. त्यात त्यांना संबोधित करताना ते म्हणाले होते की, उद्धव ठाकरे यांनी धोका दिला त्यांना आता धडा शिकवावा लागेल. मुंबई पालिका निवडणूकीत 150 पेक्षा जास्त जागा जिंकणाऱ्या विश्वास देखील शहांनी व्यक्त केला होता. त्यावर देखील शिवसेनेने समाचार घेतला आहे.
भाजप चेहरा उघडा पडला
अमित शहा व भाजपचे ‘मिशन मुंबई’ काय आहे त्याचा भयंकर चेहरा उघडा पडला. अमित शहा व त्यांच्या लोकांनी अशा प्रकारची भाषणे पुनःपुन्हा करीत राहिली पाहिजेत. त्यातूनच जनमनाचा उद्रेक होईल. शिंदे गटाच्या खांद्यावर बंदूक ठेवून आणि राज ठाकरे यांना चुचकारून त्यांनी मुंबईवर नियंत्रण मिळविण्याचे ठरवले आहे, असे म्हणत भाजपवर शिवसेनेने प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे.
समान सत्तावाटपाचे काय?
पुढे शिवसेनेने म्हटले आहे की, अमित शहा म्हणतात, महाराष्ट्रात शिवसेनेला मुख्यमंत्रिपदाचा शब्द दिला नव्हता. हा खुलासा त्यांनी अडीच वर्षांनंतर केला, पण समान सत्तावाटपाचे ठरलेच होते. तो शब्द कोणी फिरवला? अर्थात हातात ईडी, सीबीआय व इतर संस्था आहेत म्हणून सत्य बोलणाऱ्यांच्या बाबतीत ‘पटक देंगे’ची भाषा सहज वापरली जाते. ‘शिंदे गट म्हणजेच शिवसेना’ असे बोलण्यापर्यंत मजल जाते, परंतु नियती रोज नवनवे डाव खेळत असते व राजकारणाचे चक्र हे खाली-वर होतच असते.
भाजपाला इशारा
निवडणुकीच्या माध्यमांतून पराभव करणे व तसे बोलणे हे चुकीचे नाही, पण भाजपास शिवसेना फुटल्याबद्दल आनंदाचे भरते आले आहे. शिंदे गटास बेकायदेशीरपणे राजसिंहासनावर बसवून त्यांनी ईप्सित साध्य केले. त्यांचे हास्य विकट आहे. उद्धव ठाकरे व शिवसेनेस गाडण्याची भाषा महाराष्ट्रविरोधी आहे. बाळासाहेब ठाकरेंशी व त्यांच्या विचारांशी बेइमानी आहे.
अमित शहा मुंबईत येऊन अशा विषाची पेरणी करतात व भाजपमधील ‘मराठे’ त्यावर टाळ्या वाजवतात. भाजपमध्ये एखादा चिंतामणराव देशमुख निर्माण होण्याची शक्यता नाही. मात्र अमित शहांनी शिवसेना गाडण्याची व ठाकऱ्यांना धडा शिकविण्याची भाषा सतत करीत राहावे. त्यातूनच नव्या दमाचे वीर, योद्धे निर्माण होतील. स्वतःस शिंदे गट म्हणवून घेणाऱ्यांनी तर स्वाभिमानाची सुंताच करून घेतली आहे! ते निद्रिस्त आहेत. पण ‘मऱ्हाठा’ नक्की उठेल!, असा थेठ इशारा शिवसेनेने भाजपला दिला आहे.