मुंबई (वृत्तसंस्था) गावामध्ये ग्रामपंचायती ज्याप्रमाणे लोक सरपंचपद वाटून घेतात त्याप्रमाणेच महाविकास आघाडीतल्या पक्षांनी मुख्यमंत्रीपद वाटून घ्यावं, असा टोमणा केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंनी मारला आहे. यावर आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. ‘दोन वर्षापूर्वी आमच्याकडे चावी होती म्हणून सत्तेचं टाळं उघडलं आणि शिवसेनेला सत्ता मिळाली, तसेच भाजपच्या सत्तेला टाळं लागल.’ असं म्हणत त्यांनी दानवेंना सडेतोड उत्तर दिल आहे.
माध्यमांशी बोलताना रावसाहेब दानवे यांनी काल संजय राऊत यांच्यावर टीका केली होती. “संजय राऊत हे चावी दिल्याशिवाय बोलत नाहीत, त्यांना कुणीतरी चावी देतं आणि मग ते केंद्र सरकार विरोधात टीका करतात,” अशा शब्दात दानवेंनी राऊतांना चिमटा काढला होता. त्यानंतर आज राऊतांनी दानवे यांना प्रत्युत्तर दिलं आहे. “रावसाहेब दानवे हे आमचे चांगले मित्र आहेत, कधी कधी ते विनोद करतात. त्या विनोदी शैलीचे मी कौतुक करतो,” असं सांगायलाही संजय राऊत विसरले नाहीत.
मराठा आरक्षण प्रश्नी केंद्र सरकार तोडगा काढेल : संजय राऊत
मराठा आरक्षणासाठी आज कोल्हापुरात छत्रपती संभाजीराजे यांच्या नेतृत्त्वात आंदोलन करण्यात येत आहे. याबद्दल संजय राऊत यांना विचारला असता ते म्हणाले की, “कोल्हापुरातील आंदोलनात सर्वच पक्षाचे नेते सहभागी झाले आहेत. त्यात छत्रपती संभाजीराजे, प्रकाश आंबेडकर, शिवसेनेचे स्थानिक खासदार धैर्यशील माने आणि काँग्रेसचे काही नेते ही सहभागी झाले आहे. कोल्हापुरातील आंदोलन नसून मराठा समाजाच्या भावना व्यक्त करण्यात येत आहेत. मराठा आरक्षण प्रश्नांबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, अजित पवार आणि अशोक चव्हाण हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटले आहेत. आरक्षणाचा प्रश्न सोडवावा यासाठी केंद्राकडे या नेत्यांनी साकडं घातलं आहे. त्यामुळे केंद्र सरकार लवकरच या प्रश्नावर तोडगा काढेल.”
दरम्यान, रावसाहेब दानवे म्हणाले होते, ‘महाविकास आघाडीमधल्या मुख्यमंत्रीपदाबद्दल सध्या चर्चा सुरू आहे. याबद्दल बोलताना ‘पटोले यांना येत्या तीन वर्षात मुख्यमंत्री होण्याची संधी आहे आणि येत्या तीन वर्षात अजित पवारांनीही मुख्यमंत्री व्हावं, त्यासाठी शुभेच्छा आहेत,’ असा टोला त्यांनी यावेळी लगावला होता. ते एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीदरम्यान बोलत होते. मुख्यमंत्री होण्यासाठी पटोले आणि अजित पवार यांच्याकडे तीन वर्षांचा काळ असून त्यानंतर २०२४मध्ये भाजप स्वबळावर सत्तेवर आल्याने त्यांना संधी मिळणार नसल्याचंही दानवेंनी म्हणाले होते.