लुधियाना (वृत्तसंस्था) पंजाबच्या लुधियाना कोर्टामध्ये भीषण स्फोट झाल्याचा धक्कादायक प्रकार दुपारच्या सुमारास घडला आहे. त्यामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून चार जण जखमी झाले आहेत. दरम्यान, याला अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. या स्फोटाच्या तपासासाठी दिल्लीतून NSG, नॅशनल बॉम्ब डाटा सेंटर आणि चंदीगडवरून NIA ची दोन सदस्यांची टीम लुधियानात पोहोचत आहे.
केंद्राने मागितला रिपोर्ट
या स्फोटाप्रकरणी केंद्रीय गृहमंत्रालयाने पंजाब सरकारकडून रिपोर्ट मागितला आहे. स्फोटाच्या घटनेनंतर पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी, उपमुख्यमंत्री सुखजिंदर सिंग रंधावा आणि पंजाबचे पोलीस महासंचालक घटनास्थळी पोहोचले. आणि त्यांनी घटनेची माहिती घेतली. या घटनेनंतर पंजाबमध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे.
दोन महिलांसह ३ जण गंभीर जखमी
लुधियानामध्ये दुपारी १२.२५ कोर्टाच्या तिसऱ्या मजल्यावर स्फोट झाला. या घटनेत एकाचा मृत्यू झाला आहे. तर दोन महिलांसह ३ जण गंभीर जखमी आहेत. मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी लुधियानात पोहोचण्याच्या काही वेळ आधी हा स्फोट झाला. स्फोटात जखमी झालेल्या संदीप कौर (३१ वय) आणि शरणजीत कौर (वय २५) या दोन महिलांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. लुधियाना जिल्हा कोर्टाच्या इमारतीत तिसऱ्या मजल्यावर एका बाथरूममध्ये हा स्फोट झाला. या घटनेनंतर बाथरूममध्ये एक छिन्नविछिन्न झालेला मृतदेह आढळून आला. हा मृतदेह आत्मघातकी हल्ला करणाऱ्याचा असल्याचा संशय व्यक्त केला जातोय. आता फॉरेन्सिक टीम मृतदेहाची तपासणी करत आहे. यामुळे ठार झालेली व्यक्ती आत्मघाती हल्लोखोर होता की नाही? हे स्पष्ट होईल.
आत्मघातकी हल्लेखोरोन स्फोट केला – आयुक्त गुरप्रीत भुल्लर
ज्या व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे, त्याच्याकडेच स्फोटकं होती, असं लुधियानाचे पोलीस आयुक्त गुरप्रीत सिंग भुल्लर म्हणाले. पण तो आत्मघातकी हल्लेखोर होता का? यावर ते काहीही बोलले नाही. पण स्फोटात ठार झालेली व्यक्ती ही घटनास्थळी स्फोटकं पेरण्यासाठी आली होती आणि त्याचवेळी स्फोट झाला. आता या प्रकरणी गांभीर्याने तपास सुरू आहे, असं आयुक्त गुरप्रीत भुल्लर म्हणाले.
पंजाबमध्ये काही लोक शांतता भंग करताय – अरविंद केजरीवाल
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. पंजाबमध्ये काही लोक शांतता भंग करायची आहे, असा आरोप केजरीवाल यांनी केला आहे. आधी अपमान केला. आता शांतता भंग करण्याचा प्रयत्न होतोय. पंजाबची जनता कटाला बळी पडणार नाही, असं केजरीवाल म्हणाले.