बोदवड (प्रतिनिधी) कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, विद्यार्थी विकास विभाग, जळगाव प्रायोजित आणि कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, विद्यार्थी विकास कक्ष, बोदवड आयोजित कै. ग.वी. अभ्यंकर मराठी नाट्यगीत व कै. शांताबाई अभ्यंकर मराठी भावगीत स्पर्धा संपन्न झाली. स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी उद्घाटक म्हणून कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव येथील आंतर विद्याशाखीय अभ्यास विद्याशाखेचे अधिष्ठाता मा. प्रा. एस. टी. भुकन, प्रमुख अतिथी विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाचे संचालक मा. डॉ. जयेंद्र लेकुरवाळे, विद्यापीठ नियुक्त स्पर्धेचे निरीक्षक खडसे महाविद्यालय मुक्ताईनगर येथील डॉ. संजीव साळवे, भोळे महाविद्यालय भुसावल येथील प्रा. आर. डी. भोळे तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक अरविंद चौधरी आणि विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. अजय पाटील, परीक्षक डॉ. अमोघ अमळनेर, मा. किरण सोहळे, विवेकानंद प्रतिष्ठान जळगाव तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद स्पर्धक विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते.
विद्यापीठ स्तरावर मराठी नाट्यगीत व भावगीत स्पर्धा विद्यार्थी विकास विभागाच्या मार्फत दरवर्षी कै. अभ्यंकर साहेब आणि शांताबाई अभ्यंकर यांच्या स्मरणार्थ विद्यार्थ्यांच्या गायन कलेला विकसित करण्यासाठी आयोजित केली जाते. कार्यक्रमाला जमलेल्या श्रोत्यांना बघून तानसेन होण्यापेक्षा सध्याच्या काळामध्ये कानसेन होण्याची आवश्यकता आहे कारण चांगला वक्ता किंवा गायक होण्यासाठी चांगला श्रोता असणे आवश्यक आहे असे विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. एस. टी. भुकन यांनी सांगितले. उत्तम श्रोत्यांमधूनच उत्तम गायक अथवा वक्ता निर्माण होतो असे विद्यापीठ विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. जयेंद्र लेकुरवाळे यांनी सांगितले तर विद्यार्थ्यांनी कोणत्याही कार्यक्रमाला उपस्थिती देऊन कळत नकळत अनेक गोष्टी विद्यार्थ्यांना कळत असतात असे प्रतिपादन उद्घाटन समारंभाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक अरविंद चौधरी यांनी केले.
सदर स्पर्धेच्या समारोपप्रसंगी परीक्षक डॉ. अमोघ जोशी आणि किरण सोहळे सर यांनी नाट्यगीत व भावगीत सादरीकरण करत असताना भाव व्यक्त होणे अधिक महत्त्वाचे असते खरच त्या गाण्याला अर्थ प्राप्त होतो असे सांगितले. सोबतच नाट्यगीत म्हणजे काय आणि भावगीत म्हणजे काय हे सोदाहरण स्पष्ट केले एवढेच नव्हे तर दोघांनीही नाट्यगीत आणि भावगीत यांचे सादरीकरण करून श्रोत्यांची मने जिंकली. तद्वतच खडसे महाविद्यालयातील विद्यापीठ नियुक्त निरीक्षक डॉ. संजीव साळवे यांनी दिवसभर सुरू असलेल्या नाट्यगीत व भावगीत स्पर्धेच्या आयोजन व नियोजन संदर्भातील सकारात्मक मनोगत व्यक्त केलं. समारोप समारंभाचे अध्यक्ष आणि विद्यार्थी विकास कक्षाचे अधिकारी डॉ. अजय पाटील यांनी सदर स्पर्धेचा मार्गदर्शन करून निकाल जाहीर केला त्यात नाट्यगीत स्पर्धेमध्ये अनुक्रमे प्रगती किशोर तांबट नहाटा महाविद्यालय भुसावळ प्रथम, सेजल रवींद्र बोरकर गरुड महाविद्यालय शेंदुर्णी द्वितीय तर माधुरी संतोष महाजन कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ प्रशाळा, जळगाव तृतीय यांनी क्रमांक पटकाविला. तसेच मराठी भावगीत या कला प्रकारामध्ये अनुक्रमे प्रगती किशोर तांबट महाविद्यालय भुसावळ प्रथम, माधुरी संतोष महाजन कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ प्रशाळा जळगाव द्वितीय तर चेतना प्रवीण देशमुख कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय एरंडोल यांनी पारितोषिके प्राप्त केलेत.
विद्यापीठ परिक्षेत्रातून एकूण २४ विद्यार्थ्यांनी सदर दोन्ही कला प्रकारामध्ये आपला सहभाग नोंदविला. उद्घाटन समारंभाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन सहाय्यक विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. मनोज निकाळजे आणि प्रस्तावना विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. अजय पाटील यांनी केली. समारोप समारंभाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन हिंदी विभाग प्रमुख प्रा. सौ. वैशाली संसारे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रा. युवराज आठवले, प्रा. अजित पाटील, डॉ. अमोल वाघमोडे, डॉ. ईश्वर म्हस्लेकर, डॉ. वंदना नंदवे, डॉ. मनोज निकाळजे, डॉ. रूपाली तायडे, प्रा. कंचन दमाडे, डॉ. अनिल बारी, प्रा. नितेश सावदेकर, प्रा. भूषण धनजे, राजू मोपारी, अतुल पाटील आणि शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतलेत.