मुंबई (प्रतिनिधी) राज्य निवडणूक आयोगाने दोन दिवसांपूर्वी राज्यातील नगरपालिकेच्या निवडणुका जाहीर केल्या. पण या निवडणुका पुढे ढकलण्याबाबत आयोगाशी चर्चा करणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सागितलं आहे.
गृहमंत्री अमित शाह आणि राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या भेटीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की, ओबीसी आरक्षणाविना निवडणुका नको ही आमची भूमिका आहे. पावसळ्यात नगरपंचायतीच्या निवडणुका नको याबबत आयोगाशी चर्चा करणार आहे. ओबीसी आरक्षणावर नव्या सरकारची भूमिका एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केली. ते म्हणाले की, ओबीसी आरक्षणाची याचिका सर्वोच्च न्यायालयात आहे. यासंदर्भात तुषार मेहता यांनी राज्याचे प्रतिनिधित्व करावे, यासाठी आम्ही त्यांना भेटायला गेलो होतो. ओबीसी आरक्षणाचा मुद्दा महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा आहे. ओबीसी समाजाला न्याय मिळावा, हीच आमची आधीपासूनची भूमिका होती आणि आहे. ओबीसी आरक्षणासह निवडणुका व्हाव्यात, हीच आमची इच्छा आहे. सध्या महाराष्ट्रात सर्वत्र पाऊस पडत असून काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीमध्ये निवडणुका घेणे, त्या यंत्रणा कामाला लावणे, याची मोठी तयारी करावी लागते. निवडणुकांचे वातावरण तयार व्हावे लागते. अनेकांनी ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होऊ नयेत, अशी मागणी केली आहे आणि सरकारचीही तीच भूमिका आहे. राज्यातील काही ठिकाणी अतिवृष्टी आणि पूरस्थिती लक्षात घेता, यासंदर्भात राज्य निवडणूक आयोगाची चर्चा करणार आहोत, असेही एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले.