छत्रपती संभाजीनगर (वृत्तसंस्था) दारू पिण्यास पैसे दिले नाही म्हणून झालेल्या वादात एक इसमाने आपल्या बहिणीच्या नवऱ्याचा खून केल्याची खळबळजनक घटना बुधवारी (दि १२) सायंकाळी ७ वाजेदरम्यान तपोवन (ता कन्नड) येथे घडली. रंजित अंकुश माळी (४५ रा. घुसूर ह मु. तपोवन ) असे मयताचे नाव आहे. तर घटनेनंतर संशयित आरोपी गौताळा जंगलात फरार झाला आहे.
तपोवन येथील कल्पना बाबू गायकवाड हिचा घुसूर येथील रंजित अंकुश माळी (४५, रा घुसूर ता. कन्नड) याच्यासोबत काही वर्षांपूर्वी विवाह झाला होता. लग्नानंतर अंकुश माळी हा मजुरीसाठी सासरवाडीतच म्हणजे तपोवन (ता. कन्नड) येथे आपल्या पत्नी व दोन मुलांसह पाच-सहा महिन्यांपासून सासऱ्याच्या झोपडी शेजारीच दुसरी झोपडी बांधून राहत होता. घटनेच्या दिवशी बुधवारी (दि १२) तपोवन येथे किराणा सामान आणण्यासाठी गेलेल्या साला व मेव्हणा यांच्यात दारू पिण्यास पैसे देण्याहून वादावादी झाली. करदडी जंगल पायथ्याशी असलेल्या झोपडीवर येताच मेव्हण्याने आपली पत्नी कल्पना हिला ‘तुझा भाऊ नंदू याला दारू पिण्यास पैसे दिले नाही म्हणून तो माझ्यासोबत भांडला’, अशी माहिती दिली. ही बाब नंदुने ऐकल्यानंतर पुन्हा त्यांच्यात चांगलाच वाद होऊन हाणामारी झाली व साल्याने झोपडीच्या कुडातून कुऱ्हाड काढून दाजी (मेहुणा) रंजित माळी यांच्या गळ्यावर सपासप दोन वार करून ठार केले. मेव्हणा मयत झाल्याचे समजताच साल्याने तेथून गौताळा जंगलातून पळ काढला. नंदू बाबू गायकवाड ( वय ३५ रा. तपोवन) असे आरोपीचे नाव आहे.
या प्रकरणी पिशोर पोलिस ठाण्यात आरोपी विरूध्द गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास सपोनि कोमल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सतिश बडे, पोहे विलास सोनवणे, पंढरी इंगळे, सोपान डकले, लालचंद नागलोद, पवार, कौतिक सपकाळ, विजय बोटकर, चव्हाण, पवन खांबट, दीपक सोनवणे अधिक तपास करीत आहेत. मयताची पत्नी कल्पनाने आरडाओरडा करताच काही नातेवाईक जमा झाले. त्यांनी हे प्रकरण येथील सरपंच नारायण सोनवणे व लक्ष्मण सोनवणे यांना कळवले त्यांनी लागेल ही माहिती पोलिसांना कळवताच पोलीस घटनास्थळी हजर झाले. दि. १३ गुरुवार रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र करंजखेडा येथे रंजित माळी यांचे शवविच्छेदन करण्यात आले. गुरुवारी सकाळी मयताची पत्नी कल्पना माळी यांनी पिशोर पोलिस ठाण्यात भाऊ नंदू गायकवाड याच्याविरुद्ध फिर्याद दिली. त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.