नवी दिल्ली (वृत्तसंस्था) उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांनी भटक्या प्राण्यांच्या मुद्द्यावरून योगी सरकारवर निशाणा साधला आहे. प्रवासादरम्यान समोर आलेल्या बैलाचा व्हिडिओ अखिलेश यादव यांनी ट्विटरवर शेअर केला आहे आणि लिहिले की, “सफ़र में साँड़ तो मिलेंगे… जो चल सको तो चलो. बड़ा कठिन है यूपी में सफ़र जो चल सको तो चलो!.”
आज अखिलेश यादव सीतापूर दौऱ्यावर असताना प्रवासादरम्यान त्यांच्या वाहनाच्या समोर अचानकपणे एक बैल आला त्यामुळे काही क्षणासाठी त्यांचा वाहन ताफा थांबला होता. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर तो व्हिडिओ अखिलेश यादव यांनी ट्वीट केला आणि म्हटले की, “सफ़र में साँड़ तो मिलेंगे… जो चल सको तो चलो. बड़ा कठिन है यूपी में सफ़र जो चल सको तो चलो!.”
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत अखिलेश यादव सतत भटक्या प्राण्यांचा मुद्दा उपस्थित करत होते. आज समाजवादी पार्टीने बैलाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची बातमी शेअर करताना ट्विट केले की, “शेतात चारा कापायला गेला शेतकरी आणि त्याला मृत्यू आला. पिलीभीतच्या काकरौआ गावात बैलाच्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा मृत्यू, हे अत्यंत दुःखद! शोकाकुल परिवाराच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत, सरकारने आर्थिक मदत करावी.”
विधानसभा निवडणुकीत भाजपाने उत्तर प्रदेशमध्ये सलग दुसऱ्यांदा दणदणीत विजय मिळवला आहे. भाजपने ४०३ पैकी २५५ जागा जिंकल्या आहेत. दुसरीकडे समाजवादी पक्षाला १११ जागांवर यश मिळाले आहे. आपल्या पराभवावर अखिलेश यादव यांनी आज पुन्हा सांगितले की, “जी निवडणुक झाली आहे त्यामध्ये समाजवाद्यांचा नैतिक विजय झाला आहे. समाजवादी कार्यकर्ते व नेत्यांच्या संघर्षामुळे आणि जनतेच्या सहकार्यामुळे समाजवादी पक्ष वाढतो आहे आणि भाजपा कमी झाला आहे.”