औरंगाबाद (वृत्तसंस्था) एमआयएमच्या वतीने राज्यात तिरंगा यात्रा काढायला सुरुवात झाली आहे. सभेसाठी मैदान बुक करण्याचा प्रयत्न केला. पण शिवसेना आणि सत्ताधाऱ्यांनी आमच्यावर निर्बंध आणले. धमक्या देत आमचे कार्यक्रम रद्द केले, असा आरोप खासदार इम्तियाझ जलील यांनी केला आहे. महाराष्ट्रातील मुस्लीम व्यक्ती हातात तिरंगा घेऊ शकत नाही का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
मुस्लिम आरक्षण आणि वक्फ बोर्डाच्या जमिनीसंदर्भात जलील यांच्यासह एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांची आज मुंबईत सभा होते आहे. आज सकाळीच औरंगाबादवरुन एमआयएमच्या मोर्च्याने मुंबईच्या दिशेने कूच केलं आहे. दुपारपर्यंत हा मोर्चा मुंबईच्या वेशीवर धडकेल. मात्र, मुंबई पोलिसांनी शुक्रवारी रात्रीच मुंबईत कोणताही मोर्चा किंवा सभा घेता येणार नाही, असा आदेश काढला आहे. मुंबईला येताना तिरंगा झेंडा लावू नका असे आदेश पोलिसांनी काढले आहेत. मला त्यांना सांगायचंय की, तिरंगा झेंडा आमच्या पक्षाचा झेंडा नाही तर आमच्या स्वाभिमानाचा झेंडा आहे. महाराष्ट्रातील मुसलमान हातात तिरंगा झेंडा घेऊ शकत नाही का?, हाच प्रश्न आम्ही सरकारला प्रश्न विचारायला जातोय”, असं जलील म्हणाले.
ज्यावेळी राज्यात शिवसेना भाजपचं सरकार होतं, त्यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी मुस्लिम आरक्षणासाठी भांडत होते, मात्र आता तेच सत्तेत बसले आहेत. गेली अडीज वर्ष त्यांनी मुस्लिम आरक्षणावर एक चकार शब्दही काढला नाही. मला त्यांना आता विचारायचंय, तुम्ही गप्प का?, मुस्लिम समाज आणि आरक्षणाचा एवढा कळवळा होता, तर मग आता मुस्लिम समाजाला आरक्षण का देत नाही”, अशा शब्दात जलील यांनी काँग्रेस राष्ट्रवादीचा समाचार घेतला. शिवसेनेचा समाचार घेताना जलील म्हणाले, “जेव्हा जेव्हा आम्ही हॉल, मैदानं बुक करायला जातो, तेव्हा तेव्हा तिथे शिवसेना, सत्ताधारी पक्षाचे लोक येऊन आयोजकांना धमक्या देत असतात, कार्यक्रम रद्द करायला भाग पाडत असतात, पण मला आज त्यांना सांगायचंय, की तुम्ही कितीही आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करा, आमचा आवाज दबणार नाही”