मनमाड (वृत्तसंस्था) मनमाड-लासलगाव रोडवरील रायपूर खंडेराव मंदिराजवळ दुचाकी आणि कारची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात दोन तरुण ठार झाले. खंडेराव मंदिराजवळील वळणावर गुरुवारी (दि. ९) साडेचार वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. यात मृत्यू झालेले दोन्ही तरुण मनमाड येथील असून, त्यांच्या अपघाती मृत्यूने शहरात हळहळ व्यक्त होत आहे.
मनमाडच्या गौतमनगर येथील पवन विनोद जाधव (वय २०) व त्याचा मित्र योगेश पद्माकर अडांगळे (वय २१) हे दोघे दुचाकीने (क्र. एमएच १५ बीए ८२८६) लासलगाव मार्गे विंचूरकडे जात होते. याचवेळी खंडेराव महाराज मंदिराजवळील वळणावर समोरून येणारी इको चारचाकी (क्र. एमएच १९ डीव्ही ७३९४ त्यांच्या दुचाकीला धडकली. दोन्ही वाहनांमध्ये समोरासमोर जबर धडक झाल्याने या अपघातात पवन व त्याचा मित्र योगेश हे दोघे गंभीर जखमी झाले.
अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य करीत तरुणांना मनमाडच्या उपजिल्हा रुग्णालयात आणले. त्यांच्यावर प्रथमोपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी मालेगाव येथे घेऊन जात असताना त्यांची रस्त्यातच प्राणज्योत मालवली. दरम्यान, याप्रकणी पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून अपघाताचा गुन्हा दाखल केला आहे.
अरुंद रस्त्यामुळे अपघात
मनमाड-लासलगाव या रोडवर गेल्या काही महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात वाहतूक वाढली आहे. त्यामुळे रस्ता अरुंद आणि वाहने जास्त अशी परिस्थिती असून, रस्त्याच्या कडेला झाडे झुडपे वाढल्यामुळे वळणावर समोरून येणारे वाहन दिसत नसल्याने अपघाताचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे संबंधित विभागाने रस्त्याचे रुंदीकरण करून ही झाडेझुडपे हटविण्याची मागणी येथील सामाजिक कार्यकर्ते भागवत झाल्टे यांनी केली आहे.