मुंबई (वृत्तसंस्था) देशाची एकूण लोकसंख्या किती हे जाणून घेण्यासाठी दर दहा वर्षांनी देशात जनगणना होत असते. दरम्यान आपल्या देशाची १६ वी जनगणना २०२१ मध्ये होणार आहे. विशेष बाब म्हणजे ही जनगणना मोबाइल अॅपवरून होणार आहे. जनगणनेला एप्रिल किंवा मे महिन्यात सुरुवात होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजपा नेत्या पंकजा मुंडेंनी जातीनिहाय जनगणना करण्याची मागणी केली आहे. दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या लोकसभेतील भाषणाचा व्हिडीओ ट्विट करून मोदी सरकारलाच ओबीसींना दिलेल्या ‘कुछ वादेंची’ आठवण करून दिली आहे.
भाजपा नेत्या आणि दिवंगत नेते गोपीनाथ मुंडें यांच्या कन्या पंकजा मुंडेंनी जातीनिहाय जनगणना करण्याची सूचना केंद्र सरकारला केली आहे. पंकजा यांनी तत्कालीन खासदार आणि दिवंगत भाजपा नेते गोपीनाथ मुंडेंच्या २०११ मधील संसदेतील भाषणाचा व्हिडिओ आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केला आहे. त्यामध्ये, गोपीनाथ मुंडेंनी केंद्र सरकारकडे ओबीसी जनगणना स्वतंत्र करण्याची मागणी केली होती. त्यावेळी, आयआयटी प्रवेशासाठी ओबीसीच्या विद्यार्थ्यांना आरक्षण देण्यात आले होते. त्यावेळी, न्यायालयात एक जनहित याचिका दाखल झाली होती. त्यामुळे, ओबीसीची आकडेवारी न्यायालयात सादर करण्याचे आदेश कोर्टाने दिले होते. पण, ओबीसीच्या लोकसंख्येची आकडेवारीच आमच्याकडे नाही, असे सरकारने म्हटल्याचं गोपीनाथ मुंडेंनी सांगितल होतं. तसेच, आजही समाजाची मानसिकता जातीवाचक असून पूर्णपणे जात नष्ट झाली नाही. त्यामुळे, जातीनिहाय जनगणना करण्यात यावी, असे मुंडेंनी लोकसभेत बोलताना म्हटले होते. देशात ५४ टक्के ओबीसी समाज असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं होतं. पंकजा यांनी गोपीनाथ मुंडेंच्या याच भाषणाचा दाखला देत, जातीनिहाय जनगणना करण्याची मागणी केली आहे. तसेच, कुछ यादे और कुछ वादे.. असे म्हणत केंद्र सरकारला आठवणही करुन दिलीय.
पंकजा मुंडे यांनी आपल्या दुसऱ्या ट्वीटमध्ये म्हटलंय की, “२०२१ ची जनगणना जातीनिहाय होणं आवश्यक आहे. गावागावातून उमटलेला आवाज हा राजधानीपर्यंत जरुर पोहचेल यात शंका नाही. हे ट्वीट करताना पंकजा मुंडे यांनी स्व. गोपीनाथ मुंडेंचा एक जुना व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ २०११ सालचा आहे. त्यावेळी संसदेत बोलताना भाजप नेते स्व. गोपीनाथ मुंडे म्हणाले होते की, “आम्हीही या देशाचे नागरिक आहोत. आमची एवढीच मागणी आहे की ओबीसींची आणि एसटी, एससी लोकसंख्येची जनगणना करावी. अन्यथा सरकारला या लोकांच्या रोषाला सामोरं जावं लागेल.”