मुंबई (वृत्तसंस्था) केंद्र सरकारने देशातील इंधनावरील कर कमी केल्याने इंधनाचे दर कमी झाले आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( Nana Patole ) यांनी केंद्रातील भाजप सरकारवर टीका केली आहे. काल इंधनावरील कमी केलेले कर म्हणजे निव्वळ धुळफेक, असल्याची टीका नाना पटोले (Nana Patole) यांनी केली.
कर कमी करून जनतेला दिलासा दिल्याचे ढोल भाजप नेते वाजवत आहेत. प्रत्यक्षात ही कर कपात व भाजप नेते करत असलेले दावे जनतेच्या डोळ्यात धुळफेक करणारे आहेत. पेट्रोलच्या ९.५ रुपयातील जवळपास ४ रु. आणि डिझेलच्या ७ रु. दर कपातीतील जवळपास ३ रुपये राज्य सरकारच्या हिस्स्याचे आहेत. मोदी सरकार खरचं इमानदार असेल आणि जनतेला दिलासा द्यायचा असेल तर २०१४ सालापासून इंधनावर वाढवलेले अन्याकारक कर रद्द करावेत. जेणेकरून खऱ्या अर्थाने इंधन दर कमी होतील, आणि महागाईला लगाम लागेल, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले म्हणाले.
२०१४ साली पेट्रोलवर ९.५६ रुपये तर डिझेलवर ३.४८ रुपये अबकारी कर होता. त्यावेळी क्रूड ऑईलचे दर आंतरराष्ट्रीय बाजारात प्रती बॅरल १११ डॉलरच्यावर होते. आज क्रूड ऑईलचे दर त्यावेळी पेक्षा कमी आहेत. तरीही जास्तीचे कर लावले जात आहेत. मोदी सरकारने मागील सात वर्षात इंधनावरील करातून तब्बल २७ लाख कोटी रुपये कमावले. रिझर्व्ह बँकेतून २.५ लाख कोटी रुपये काढून घेतले. अस्कमित निधी कधीही काढलेला नव्हता तोही मोदी सरकारने काढला. कर्जाचे प्रमाण सकल उत्पन्नाच्या ९० टक्के आहे. गॅस सिलींडरच्या बाबतीतही ७०० रुपयांची वाढ करायची आणि २०० कमी करणे म्हणजे ‘आवळा देऊन कोहळा’ काढण्याचा प्रकार आहे. सामान्य जनतेची महागाईच्या गर्तेतून सुटका करायची मोदी सरकारची प्रामाणिक इच्छा असेल तर गॅस सिलिंडर ४०० रुपये करा आणि सबसीडी पूर्ववत करा, असंही पटोले म्हणाले.