नांदेड (वृत्तसंस्था) केंद्र सरकार शेतकऱ्यांशी सुरुवातीला बोलायला तयार नव्हते. केंद्र सरकार शेतकऱ्यांशी बोललं तरी कायदे मागे घेत नसल्यामुळे चर्चा निष्फळ होत आहेत. कृषी कायद्यांबाबत केंद्राची भूमिका ताठर असल्याचा आरोप काँग्रेस नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केला आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांनी भारत बंद यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करण्याचं आवाहन अशोक चव्हाणांनी केले आहे.
केंद्र सरकारने मंजूर केलेले तीन नवे कृषी कायदे शेतकऱ्यांच्या विरोधात असून, हे कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या आंदोलनाला संपूर्ण देशाचा पाठिंबा आहे. शेतकऱ्यांच्या मागण्यांंसंदर्भात केंद्र सरकारने झोपेचे सोंग घेतले असून, त्यांना जागे करण्यासाठी ८ डिसेंबरचा ‘भारत बंद’ महत्वाचा आहे. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी नागरिकांच्या सहकार्याने हे आंदोलन यशस्वी करून शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करण्यासंदर्भात केंद्रावरील दबाव वाढवावा, असं आवाहन अशोक चव्हाण यांनी केले आहे. भाजप सोडून सर्व राजकीय पक्षांनी भारत बंदला पाठिंबा दिला आहे. शेतकऱ्यांच्या भावना आणि कायदे कसे शेतकरी विरोधी आहेत, हे केंद्र सरकारपर्यंत पोहोचवावे, असं अशोक चव्हाण म्हणाले. केंद्र सरकानं संसदेत कृषी विधेयक मांडण्यापासून ते मंजूर करेपर्यंत काँग्रेसनं विरोधाची भूमिका घेतली आहे. काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी, काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनी सातत्यानं कृषी कायद्यांना विरोध केला आहे.