नवी दिल्ली (वृत्तसंस्था) राजधानी दिल्लीमध्ये शेतकऱ्यांचं नव्या कृषी कायद्याविरोधात आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाचा आजचा १७वा दिवस आहे. आतापर्यंत अनेक बैठकांच्या फेऱ्या झाल्या मात्र शेतकरी अद्यापही आपल्या मागणीवर ठाम असून आता आक्रमक भूमिका घेतली आहे. दिल्लीला जोडणारे महामार्ग अडवून चक्का जाम आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.
कृषी कायदा रद्द करण्याच्या मागणीवर अडून बसलेले शेतकरी आज आंदोलन अजून तीव्र करणार आहेत. शेतकरी आज देशभरात टोल फ्री करतील. यासोबतच दिल्ली-जयपूर आणि दिल्ली-आग्रा हायवे जाम करतील. दरम्यान जर सरकारने चर्चेसाठी बोलावले तर ते जाण्यासाठी तयार असल्याचेही शेतकऱ्यांनी सांगितले आहे. केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांच्या संवैधानिक वैधतेला आव्हान देणाऱ्या प्रलंबित याचिकांमध्ये पक्षकार करण्याच्या मागणीसाठी भारतीय किसान युनियनने शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. केंद्र सरकारने केलेले नवे कृषी कायदे असंवैधानिक, शेतकरीविरोधी आहेत. या कायद्यांमुळे मोठ्या कंपन्या आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या लालसेपुढे शेतकरी हतबल ठरेल. हे कायदे शेतक ऱ्यांच्या हिताचे नाहीत, तर त्यामागे कंपन्यांचे हित साधण्याचा कुटिल हेतू आहे, असे भारतीय किसान युनियनने न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत नमूद केले आहे. दरम्यान, आता यावर तोडगा निघत नसल्याचं म्हणत शेतकऱ्यांनी आता ‘चक्का जाम’ करण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांकडून दिल्ली-जयपूर महामार्ग ठप्प करण्यात येणार आहे.
शेतकऱ्यांचा टोलमुक्त करण्याचा इशारा लक्षात घेता फरीदाबाद पोलिस दिल्ली-हरियाणा रस्त्यावरून येणाऱ्या ५ टोल प्लाझावर ३५०० पोलिस तैनात करणार आहेत. बदरपुर, गुरुग्राम-फरीदाबाद, कुंडली-गाझियाबाद-पलवल, पाली क्रशर झोन आणि धौज टोल प्लाझा येथे निदर्शकांवर बारीक नजर ठेवली जाईल. पोलिसांनी सांगितले की ते सर्वांचा आदर करतात, परंतु कायदा व सुव्यवस्था बिघडू लागल्यास कठोर कारवाई केली जाईल.