नवी दिल्ली (वृत्तसंस्था) चीनच्या पीएलएने नियोजनबद्धरित्या भारतीय सैन्यावर हल्ला केला. भारतीय जवानांनी सुद्धा यावेळी प्रत्युत्तर देत चीनला वठणीवर आले. या संघर्षात भारताचे २० जवान शहीद झाले, तर चीनचे ४० पेक्षा जास्त सैनिक मारले गेले. त्यानंतर आतापर्यंत दोन्ही देशांमध्ये वरिष्ठ सैन्य पातळीवर चर्चेच्या नऊ फेऱ्या होऊनही कुठलाही तोडगा निघू शकला नव्हता. तर आता चीननं पँगाँग तलावाच्या उत्तर आणि दक्षिण किनाऱ्यावरुन माघार घेण्यास सुरुवात केली आहे.
मागच्यावर्षी मे महिन्यात चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने पूर्व लडाख सीमेवर अतिक्रमण केल्यानंतर भारत-चीनमध्ये सीमा वादाला सुरुवात झाली. परस्परांने इशारे, शाब्दीक बाचाबाची आणि धक्काबुक्की असे सुरुवातीला या वादाचे स्वरुप होते. पण १५ जूनला गलवान खोऱ्यात चीनने आपला खरा विश्वासघातकी चेहरा दाखवला. यावेळी दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये झालेल्या रक्तरंजित संघर्षामुळे परिस्थिती चिघळली आणि वाद आणखी विकोपाला गेला. लडाख वरील वास्तविक नियंत्रण रेषेवर गेल्या नऊ महिन्यांपासून भारत – चीनचं सैन्य एकमेकांच्या समोर उभं होतं. दोन देशांमधील तणाव आता कमी होण्यास सुरुवात झाली आहे. दोन्ही देशांमध्ये झालेल्या चर्चेनंतर चीनी सैन्य अत्यंत वेगानं LAC वरुन मागं सरकत आहे. चीन आणि भारत यांच्यात झालेल्या सहमतीनुसार चीननं पँगाँग तलावाच्या उत्तर आणि दक्षिण किनाऱ्यावरुन माघार घेण्यास सुरुवात केली आहे. गेल्या दोन दिवसात चीननं या भागातून २०० रणगाडे हटवले आहे.
‘पँगाँग तलावाच्या उत्तर आणि दक्षिण किनाऱ्यावरुन सैन्य मागं घेण्याबाबत भारत आणि चीनमध्ये सहमती झाली आहे,’ अशी माहिती केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी गुरुवारी संसदेत दिली होती. या चर्चेमध्ये भारतानं काहीही गमावलं नसल्याचं त्यांनी सांगितले होते. चीनबरोबर झालेल्या सहमतीनंतर दोन्ही देश नियोजनबद्ध पद्धीतीनं आणि परस्परातील समन्वयातून या भागातील सैन्य मागं घेतील, असं सिंह यांनी स्पष्ट केलं होतं. भारत आणि चीन यांच्या सीमेवर गेल्या नऊ महिन्यांपासून सुरु असलेल्या तणावानंतर हे यश मिळालं आहे. मात्र पूर्व लडाख परिसरातील सैन्याच्या टेहाळणीबाबत अजूनही काही मुद्दे प्रलंबित असून त्यावर दोन्ही देशांमध्ये यापुढेही चर्चा सुरु राहणार आहे.
भारतीय लष्करानं एक व्हिडीओ शेअर केला असून यामध्ये पँगाँग तलावाच्या परिसरातून चीनच्या पिपल्स लिबरेशन आर्मीचे तीन रणगाडे आणि भारतीय सैन्याचा एक रणगाडा माघारी फिरताना दिसत आहे. त्याचबरोबर दोन्ही देशांच्या सैन्य अधिकाऱ्यांमध्ये झालेल्या बैठकीचं संक्षिप्त फुटेज देखील प्रसिद्ध करण्यात आलं आहे. रणगाडे तसंच सैन्यासाठी आवश्यक असलेलं साहित्य मागं घेण्याची प्रक्रिया जवळपास पूर्ण झाली आहे. आता उत्तर किनाऱ्यावरील सैन्य मागं घेण्याची प्रक्रिया राबवली जात आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. भारत आणि चीन यांच्यातील तणाव कमी व्हावा यासाठी सप्टेंबर २०२० पासून दोन्ही देशांमध्ये चर्चा सुरु आहे. चर्चेच्या अनेक फेऱ्यानंतर पहिल्यांदाच सैन्य मागं घेण्याच्या मुद्यावर दोन्ही देशांमध्ये सहमती झाली आहे.
“भारताने सुद्धा आपली शस्त्रसज्ज वाहने मागे घेण्यास सुरुवात केली आहे. पण चीनचा स्वभाव लक्षात घेता, परिस्थिती बिघडली तर प्रत्युत्तर देण्याची योजना देखील तयार आहे” असे नरेंद्र मोदी सरकारमधील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. जगातील सर्वात मोठे लष्कर, सैन्य शक्ती आणि महासत्ता असल्याचे चीन दाखवतो. पण चीनला त्याच्या कुठल्याही उद्दिष्टामध्ये यशस्वी होऊ न देता पुन्हा कायमस्वरुपी तळावर पाठवून देण्यात भारत यशस्वी ठरला आहे.
















