अहमदनगर (वृत्तसंस्था) संगमनेर येथील शहर पोलीस ठाण्याच्या कारागृहातून चार कैद्यांनी सिनेस्टाईल पलायन केल्याची घटना बुधवारी पहाटे पाच वाजता उघडकीस आली. बलात्कार, खून सारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये कारागृहात असणाऱ्या चार आरोपींनी एकाच वेळी पळ काढल्यामुळे पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे. या आरोपींना पकडण्यासाठी पोलीस पथके रवाना झाली आहेत. राहुल देविदास काळे, रमेश थापा, अनिल छबू ढोले आणि मच्छिंद्र मनाजी जाधव अशी या चार फरार गुन्हेगारांची नावे आहेत.
अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर शहर पोलीस ठाण्यातील जेलमध्ये या चार कैद्यांना इतरांसोबत ठेवण्यात आले होते. त्या कारागृहामध्ये मंगळवारी रात्री नेहमीप्रमाणे तीन पोलीस कर्मचारी बंदोबस्तास होते. संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या शेजारीच हे उपकारागृह आहे. बुधवारी पहाटे या कारागृहातील नंबरच्या कोठडीचे गज कापून चार आरोपींनी पलायन केले. अनेक दिवसांपासून हे आरोपी संगमनेरच्या उपकारागृहात न्यायालयीन कोठडीत बंदिस्त होते.
पळून गेलेल्या आरोपींपैकी राहुल काळे याच्यावर संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल आहे. मच्छिंद्र जाधव याच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा, तर रमेश थापा याच्यावर अत्याचाराचा गुन्हा दाखल आहे. या आरोपींनी अतिशय नियोजनबद्ध कारागृहातून पलायन केल्याचे समोर आले आहे. कोठडीचे गज कापून बाहेर आल्यानंतर कारागृहाच्या बंदोबस्तास असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना दमदाटी करून ते एका खासगी वाहनामध्ये बसून पळून गेले.
कारागृहातून आरोपी पळून गेल्याचे वृत्त वाऱ्यासारखे पसरले. शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे, उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे, तहसीलदार धीरज मांजरे आदी अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी येऊन पाहणी केली. आरोपी पळून गेले त्यावेळी तीन पोलीस कर्मचारी कारागृहाच्या बंदोबस्तात होते. तरीही हत्यार कसे उपलब्ध झाले?,असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दरम्यान, आरोपींच्या शोध घेण्यासाठी पोलिसांची ५ पथके रवाना झाली आहेत. विशेष म्हणजे वर्षभरापूर्वी दोन आरोपींनी संगमनेर कारागृहातून पलायन केल्याची घटना घडली होती.