धरणगाव (प्रतिनिधी) – धरणगाव शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांना दिवस असो वा रात्र, सततच्या वीज खंडित होण्याच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. शहरातील काही भागांत तर तीन ते चार तासांपर्यंत वीजपुरवठा खंडित केला जात असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.
या संदर्भात महावितरणच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्यास समाधानकारक उत्तर मिळत नाही. अनेकदा अधिकाऱ्यांचे मोबाईल क्रमांक सतत व्यस्त किंवा बंद असल्याचे दिसून येते. यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
शहर व ग्रामीण भागात महावितरणच्या अनियमित कारभारामुळे धरणगाव तालुका त्रस्त झाल्याचे चित्र आहे. नागरिकांनी तसेच विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी लेखी तक्रारी करूनही अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. या बेजबाबदारपणाला जबाबदार कोण, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
काही दिवसांपूर्वी जिल्हा नियोजन बैठकीत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रचंड उष्णतेच्या पार्श्वभूमीवर (तापमान ४८ ते ५० अंशांपर्यंत) वीजपुरवठा खंडित होऊ नये, अशा सूचना अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. मात्र, या सूचनांकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत असून अधिकाऱ्यांनी या तंबीला केराची टोपली दाखवल्याची चर्चा आहे.
दरम्यान, महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून सौर पॅनल बसविण्याचे काम सुरू असून, या प्रक्रियेत महावितरणचे काही कर्मचारी व संबंधित एजन्सी यांच्यात मिलीभगत असल्याचा आरोपही करण्यात येत आहे. या प्रकरणाकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
वीजपुरवठा सुरळीत करा, अन्यथा..
“पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जिल्हा नियोजन बैठकीत स्पष्ट सूचना देऊनही शहर व ग्रामीण भागातील वीजपुरवठा सुरळीत होत नाही. नागरिक त्रस्त आहेत. तात्काळ वीजपुरवठा सुरळीत करावा, अन्यथा आम्ही आमच्या पद्धतीने आंदोलन करू. तसेच सौर पॅनल प्रकरणातील मिलीभगतीची चौकशी करावी.”
- धीरेंद्र पुरभे (शहराध्यक्ष, शिवसेना शिंदे गट)
गुलाबराव वाघ यांच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन
“शहरातील काही भागात रात्रीच्या वेळी वीजपुरवठा खंडित होतो. अधिकाऱ्यांशी संपर्क साधणे कठीण होते. महावितरणने तक्रार निवारणासाठी स्पष्ट संपर्क क्रमांक जाहीर करावेत. वीजपुरवठा सुरळीत न झाल्यास उपनेते गुलाबराव वाघ यांच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.”
विनोद सुरेश रोकडे (युवासेना उपजिल्हा संघटक, धरणगाव)














