जळगाव (प्रतिनिधी) कोल्हे हिल्स परिसर, पलोड शाळा रोड येथील वसाहतीत गेल्या 16 वर्षांपासून विजेसंदर्भातील समस्या सतत सुरू असून यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. वारंवार तक्रारी करूनही दुर्लक्ष होत असल्याने अखेर आज (४ जून) संतप्त नागरिकांनी थेट महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या (महावितरण) उपविभागीय कार्यालयात जाऊन उप अधीक्षक अभियंता विजय कापुरे यांना सामूहिक निवेदन दिले. यावेळी विजय कापुरे यांनी शनिवारपासून काम सुरु होणार असल्याचे आश्वासनही दिले.
निवेदनात डीपीवरील विजेचा भार वाढवणे, सिंगल फेजऐवजी थ्री फेज कनेक्शन देणे, तसेच वारंवार लाईट जाण्याची समस्या दूर करणे, या मागण्यांचा समावेश होता. पलोड शाळा रोड परिसरात वयोवृद्ध, लहान मुले, विद्यार्थी आणि कामकाजी वर्गाला अत्यंत त्रास सहन करावा लागत असल्याचे नागरिकांनी यावेळी स्पष्ट केले.
विजय कापुरे यांची तात्काळ प्रतिक्रिया
उप अधीक्षक अभियंता विजय कापुरे यांनी नागरिकांची समस्या गांभीर्याने ऐकून घेतली. त्यांनी कॉन्ट्रॅक्टरला तात्काळ फोन करून काम लवकर सुरू करण्याचे निर्देश दिले. यावेळी उपस्थित नागरिकांसमोर त्यांनीच आश्वासन दिले की, शनिवारपासून डीपीचा भार वाढवण्याचे आणि थ्री फेज कनेक्शनचे काम सुरू करण्यात येईल.
अधिकाऱ्यांना पूर्वीही निवेदन
नागरिकांनी याआधी कार्यकारी अभियंता, वायरमन, सबस्टेशन अभियंता यांच्याकडे देखील लेखी निवेदने दिली होती. मात्र, त्याकडे दुर्लक्ष झाले. त्यामुळे आता उपअधीक्षक स्तरावर हा मुद्दा मांडावा लागला.