श्रीनगर (वृत्तसंस्था) जम्मू कश्मीरच्या किश्तवाडमध्ये ढगफुटी झाली आहे. आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू झाला असून ४० जण बेपत्ता आहेत. आतापर्यंत दहा घरांचे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापन आणि जम्मू कश्मीर पोलीस घटनास्थळी पोहोचले असून शोधकार्य आणि बचाव कार्य सुरू आहे अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
पोलीस नियंत्रण कक्षाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार बुधवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास किश्तवाड जिल्ह्यातील दाछिन परिसरातील होन्जार गावात ढगफुटी झाली. त्यानंतर ३० ते ४० लोक बेपत्ता असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर शोध आणि बचाव कार्य सुरू केले आहे. आमच्याकडे अद्याप अचूक माहिती नाही तसेत येथे मोबाईल फोन कनेक्टिव्हिटी नाही.
किश्तवाड जिल्हा पोलीस प्रमुख एसएसपी शफकत भट यांनी सांगितले की, ढिगाऱ्याखालून आतापर्यंत आम्हाला चार मृतदेह सापडले आहेत. जेव्हा ही घटना घडली तेव्हा गावात ३० ते ४० लोक होते. किश्तवाड शहर जम्मूपासून सुमारे २०० किमी अंतरावर आहे आणि दाछिन हे किश्तवाड जिल्ह्यातील दुर्गम आणि डोंगराळ परिसरात आहे.
अनेक राज्यात मुसळधार
सध्या देशातील अनेक प्रमुख राज्यांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. मानसूनचे तिसरे कमी दाबाचे क्षेत्र बंगालच्या खाडीत विकसित होत आहे. यामुळे शनिवारपर्यंत उत्तर भारतात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, देशात २७ जुलैपर्यंत ४०८.५ मिमी पावसाची नोंद झाली आहे.