नवी दिल्ली (वृत्तसंस्था) ‘मतभेदांच्या मुद्द्यावर शांततेच्या मार्गाने तोडगा काढण्यावर भारताचा भर आहे. असे असले, तरीही एकाधिकारशाही आणि आक्रमकतेचा सामना करताना आपले सार्वभौमत्व आणि भौगोलिक अखंडता यांचे रक्षण करण्यासाठी भारत कटिबद्ध आहे, असे स्पष्ट प्रतिपादन संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी केले.
या भाषणात संरक्षणमंत्री राजनाथ यांनी पाकिस्तानवरही टीकास्त्र डागले. पाकिस्तान दहशतवादाचा धोरण म्हणून वापर करत असून याबाबत त्या देशाचा हेकेखोरपणा कायम आहे. मात्र, याबाबत प्रगतिशील आणि समविचारी देशांच्या सहकार्याने आम्ही काम करत आहोत, त्यायोगे पाकिस्तानचे कारनामे उघड करण्याच्या जोडीलाच त्या कारवायांना आळा घालण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत, असे राजनाथसिंह म्हणाले. राजनाथसिंह यांनी अमेरिका, जपान आणि रशिया या देशांसोबत वाढत्या द्विपक्षीय संबंधांबद्दलही या वेळी माहिती दिली. पाकिस्तान दहशतवादाला खतपाणी घालत असतानाच, अन्य शेजारी देशांसोबत भारताने संबंध सुधारले आहेत. परस्पर सन्मानाचे व हिताचे संबंध प्रस्थापित करण्यासाठी मदत व पाठिंबा यामध्ये आम्ही मोठी गुंतवणूक केली आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. पूर्व लडाखच्या भागात भारत चीन सीमेवर गेले सात महिने तणाव कायम असतानाच, संरक्षणमंत्र्यांनी ही भूमिका स्पष्ट केली. सीमावादावर तोडगा काढण्याच्या उद्देशाने दोन्ही देशांमध्ये सुरू असलेल्या लष्करी पातळीवरील चर्चेची आठवी फेरी आज, शुक्रवारी होण्याची शक्यता आहे. त्याच्या पूर्वसंध्येला संरक्षणमंत्र्यांनी मांडलेली ही भूमिका महत्त्वपूर्ण आहे. ‘नॅशनल डिफेन्स कॉलेज’च्या हिरक महोत्सवानिमित्त आयोजित वेबिनारमध्ये बोलताना संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी ही भूमिका मांडली. ‘शांतता कायम राखण्यासाठी युद्ध टाळणे महत्त्वाचे आहे, मतभेदांना वादाचे स्वरूप येऊ नये, अशी भारताची भूमिका आहे आणि सीमावर्ती भागात शांतता राहावी यासाठी केलेल्या सर्व करारांचा सन्मान करण्यास भारत वचनबद्ध आहे,’ असेही त्यांनी या वेळी बोलताना स्पष्ट केले.