धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील साकरे गावात आधुनिक भारताचे जनक, क्रांतीसुर्य, सत्यशोधक – महात्मा ज्योतिराव फुले व भारतीय संविधानाचे शिल्पकार विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा सयुंक्त जयंतीमहोत्सव निमित्त साखरे गावात डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती व साकरे ग्रामस्थांच्या वतीने प्रबोधनपर व्याख्यान पुष्पचे आयोजन करण्यात आले.
या गुरु शिष्य जयंती महोत्सवाचे प्रास्ताविक मुख्य आयोजक रोहिदास भास्कर सोनवणे यांनी करून वक्त्यांचा परिचय करून दिला. या जयंती महोत्सवाच्या अध्यक्षस्थानी साकरे गावाचे पोलीस पाटील घनश्याम पाटील होते. व प्रमुख वक्ते म्हणून महात्मा फुले हायस्कूल चे आदर्श शिक्षक पी.डी.पाटील व इंग्लिश मिडीयम स्कूल, एरंडोल चे आदर्श शिक्षक रवींद्र गजरे होते. प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री ना.गुलाबराव पाटील, शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ, धानोरा चे सरपंच भगवान महाजन, शिवसेना उपतालुका प्रमूख मोतीलाल आप्पा पाटील, मोतीराय आप्पा, साखरेचे सरपंच शरद पाटील, भारतीय युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष निलेश पवार, भारत मुक्ती मोर्चाचे तालुकाध्यक्ष गौतम गजरे, ग्रामपंचायत सदस्य भानुदास पाटील, मोतीलाल पारधी, सामाजिक कार्यकर्ते गुलाब सोनवणे, सुभाष सोनवणे, भिका भोळे कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख अतिथी, प्रमुख वक्ते व मान्यवरांच्या हस्ते तथागत गौतम बुद्ध, कुळवाडीभूषण छत्रपती शिवराय, राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी शाहू महाराज, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. सर्व मान्यवरांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.
कार्यक्रमाचे वक्ते पी.डी.पाटील यांनी प्रथम पुष्प गुंफतांना राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले व बाबासाहेबांचा म्हणजेच गुरू – शिष्यांचा जीवनपट उलगडून त्यांचे सामाजिक – शैक्षणिक कार्य विशद केले. बाबासाहेबांनी लहानपणी जातिभेद सोसला, पाण्यासाठी, मंदिर प्रवेशासाठी संघर्ष केला. छत्रपती शिवरायांना आदर्श मानत रायगडाच्या पायथ्याशी मनुस्मृति ग्रंथाचे दहन केले. बाबासाहेबांचे गुरु तथागत गौतम बुद्ध, संत कबीर, राष्ट्रपिता ज्योतिराव फुले होते. छत्रपती शिवराय ते भिमराय यातील दुवा म्हणजे तात्यासाहेब होय. आजच्या तरुणांनी उच्च शिक्षण घेऊन उच्चपदस्थ अधिकारी होण्याचे स्वप्न पहावे असे प्रतिपादन पाटील यांनी केले.
कार्यक्रमाचे दुसरे पुष्प प्रमुख वक्ते रवींद्र गजरे यांनी आजचा समाज व युवा पिढीचा नोकरीसाठी होत असलेला संघर्ष, वास्तवता, बेरोजगारी, ढासळत चाललेली शिक्षणव्यवस्था, जाती – जाती, धर्मा – धर्मांमध्ये लावले जाणारे तेढ अशा विविध विषयांवर विस्तृत असे मार्गदर्शन केले. आजच्या तरुणांनी या महापुरुषांचा आदर्श विचार घेऊन मार्गक्रमण करावे असे प्रतिपादन गजरे यांनी केले.
या जयंती महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी गौरव बिऱ्हाडे, अजय पानपाटील, आकाश बाविस्कर, सागर बाविस्कर, समाधान संदांनशिव, समाधान सोनवणे, डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती साकरे, साकरे गावाचे सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, सन्माननीय ग्रामपंचायत सदस्य, व समस्त साकरे ग्रामस्थ यांनी परिश्रम घेऊन अनमोल सहकार्य केले. या जयंती महोत्सवाचे सूत्रसंचालन उदय मोरे तर आभार भारतीय युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष तथा पत्रकार निलेश पवार यांनी मानले.