नवी दिल्ली (वृत्तसंस्था) कृषी कायद्यांविरोधात २ महिन्यांपासून आंदोलन सुरू असलेल्या सिंघू सीमेवर पुन्हा एकदा संघर्ष पेटला आहे. शेतकरी आंदोलनावर ठाम असताना स्थानिकांनी या भागात धाव घेतली आहे. हा परिसर मोकळा करण्याची मागणी करत त्यांनी शेतकऱ्यांविरोधात घोषणाबाजी केली. यानंतर शेतकरी आणि त्या लोकांमध्ये हाणामारी झाली आणि प्रचंड दगडफेक सुरू झाली. या गर्दीत आंदोलनकर्त्या त्यांचे तंबूही नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न केला.
सिंघू सीमा गेल्या दोन महिन्यांहून अधिक काळापासून शेतकरी आंदोलनाचं मुख्य स्थान बनलंय. कृषी कायद्याविरोधात जमलेल्या हजारो शेतकऱ्यांनी इथे ठाण मांडलंय. परंतु, प्रजासत्ताक दिनाला झालेल्या हिंसाचारानंतर राजधानी दिल्ली आणि दिल्लीच्या सीमेवरील वातावरणात तणाव निर्माण झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी दुपारी मोठ्या संख्येत पोलीस कुमक तैनात असता जवळपास २०० लोकांनी या ठिकाणी पोहचून आंदोलकांवर दगडफेक केली. तसंच अनेक तंबू उखडले, फाडले. परिस्थिती चिघळल्यानंतर पोलिसांनी अश्रुधुराचा वापर केला. तसंच शेतकऱ्यांनाही शांती कायम राखण्याची विनंती करण्यात आलीय. आंदोलनकर्त्यांवर हल्ला करणारे कोण होते? ते कुठून आले होते? याबद्दल अद्याप माहिती मिळालेली नाही. शुक्रवारी दुपारी २.०० वाजल्याच्या सुमारास ही घटना घडली. या गर्दीकडून शेतकरी आंदोलकांना ‘देश के गद्दार’ म्हणत हिणवलं गेलं. काही वेळातच या गर्दीनं आंदोलनस्थळी तोडफोड सुरू केली. त्यानंतर दोन्ही बाजुंकडून दगडांचा वर्षांव सुरू झाला. परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांना अश्रुधुराचा वापर करावा लागला.
यादरम्यान एसएचओ अलीपूर प्रदीप पालीवाल हे या झडपे दरम्यान जखमी झाल्याचंही समजतंय. तणावग्रस्त वातावरणात एका अज्ञात व्यक्तीनं एसएचओंच्या हातावर तलवारीनं हल्ला केला. या हल्ल्यात पोलीस अधिकाऱ्यांच्या हातावर तलवारीचा वार झाला आणि हातातून रक्त वाहू लागलं. आज दुपारी १ वाजेच्या सुमारास नरेलाकडून आंदोलनस्थळी आलेल्या काही लोकांनी घोषणाबाजी करत शेतकऱ्यांना बॉर्डर रिकामे करण्यास सांगितले. यानंतर शेतकरी आणि त्या लोकांमध्ये हाणामारी झाली आणि प्रचंड दगडफेक सुरू झाली. यावेळी पोलिसांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, पण काही परिणाम होताना दिसला नाही. यानंतर पोलिसांना लाठीचार्ज आणि अश्रु धुराचा मारा करावा लागला. यादरम्यान एका पोलिस अधिकाऱ्याला तलवार लागली, तर पाच पोलिस कर्मचारी जखमी झाले. सध्या या ठिकाणी तणावाचे वातावरण आहे.
सिंघू सीमेशिवाय गाझीपूर सीमेवरही मोठी सुरक्षाव्यवस्था तैनात करण्यात आली आहे. गाझीपूर सीमेवर शेतकरी नेते राकेश टिकैत यांच्या ‘भारतीय किसान युनियन’ या शेतकरी संघनेकडून प्रजासत्ताक दिनाला झालेल्या हिंसाचारानंतर एक ‘महापंचायत’ बोलावण्यात आलीय.