पुणे (वृत्तसंस्था) पुण्यातील विकासकामाच्या उद्घाटनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस एकाच व्यासपीठावर आले असताना भाजप आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातल्यामुळे वातावरण तणावपूर्ण झाले होते. दरम्यान, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भामा आसखेड योजनेचे उद्घाटन झालं. हा कार्यक्रम सुरु असतानाच अचानक राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते आमनेसामने भिडले. यावेळी राष्ट्रवादी आणि भाजप या दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.
देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी एकत्र येत पहाटे घेतलेला शपथविधी गाजलेला होता. त्यानंतर दोन्ही नेते पुणे प्रथमच पुणे महापालिकेतील सार्वजनिक कार्यक्रमात एकत्र आले. भामा- आसखेड पाणी पुरवठा योजनेच्या लोकापर्णानिमित्त अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस एकत्र आले होते. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, खासदार सुप्रिया सुळे, खासदार अमोल कोल्हे, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थित होते. भामा आसखेड पाणी प्रकल्पाच्या उद्घाटन समारंभाला उपमुख्यमंत्री अजित पवार व विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार असल्याने त्याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. बऱ्याच कालावधीनंतर हे दोन नेते एकाच व्यासपीठावर येत असल्याने तिथे काय होणार, याची उत्सुकता सर्वांनाच होती. अजित पवार व फडणवीस यांच्यात गेल्या नोव्हेंबर महिन्यात सत्तेसाठी झालेली औटघटकेची मैत्री हा नेहमीच चर्चेचा विषय ठरतो. त्यामुळेच हे दोन नेते आज काय बोलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र, प्रत्यक्षात या दोन नेत्यांची भाषणं दूरच राहिली आणि कार्यकर्त्यांच्या गोंधळानेच कार्यक्रम चर्चेत आला. कोरोनामुळे नियमांचे बंधन असले तरी या कार्यक्रमाला मोठी गर्दी झाली. सभागृहाबाहेर दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यातूनच गोंधळाला सुरुवात झाली.
भामा आसखेड पाणी प्रकल्पाचं श्रेय घेण्यावरून दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. ‘एकच वादा अजित दादा’ विरुद्ध ‘पुण्याची ताकद गिरीश बापट’, अशा घोषणा देत कार्यकर्ते एकमेकांसमोर उभे ठाकले. यात काही प्रमाणात हुल्लडबाजीही पाहायला मिळाली. या प्रकल्पाचे काम देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या काळात झाले असताना आता काही जण श्रेय घेण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळेच आम्ही विरोध करत आहोत, असे भाजप कार्यकर्त्यांचे म्हणणे होते. तर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्यावर जोरदार आक्षेप घेतला. या प्रकल्पाचं श्रेय राष्ट्रवादी काँग्रेसलाच मिळायला हवं. हा प्रकल्प उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजित पवार यांच्या सातत्याच्या पाठपुराव्यामुळेच पूर्णत्वास आला आहे, असा दावा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केला. विरोधी पक्षनेते फडणवीस येथे आले असताना भाजपचे कार्यकर्ते गिरीश बापटांच्या नावाने घोषणा देत आहेत. त्यावरून ही घोषणाबाजी भाजपातीलच गटबाजीचे दर्शन घडवणारी होती, असेही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते म्हणाले.
यानंतर प्रसारमाध्यमांकडून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी याबाबत प्रश्न विचारण्यात आला. मात्र त्यांनी उत्तर देण्यास टाळाटाळ केली. तर पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी हा कार्यकर्त्यांचा उत्साह आहे, असे सांगितले. याच कार्यक्रमादरम्यान “अजित दादांसोबत कार्यक्रम असला की आधी दोन दिवस आणि नंतर दोन दिवस भरपूर बातम्या होतात,” असे वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केले होते.