नवी दिल्ली (वृत्तसंस्था) प्रणव मुखर्जी यांनी आपलं पुस्तक ‘द प्रेसिडेंशियल इयर्स’ मध्ये लिहिलं आहे की, आपली राष्ट्रपतीपदी नियुक्ती झाल्यानंतर काँग्रेसनं राजकीय दिशा गमावली. सोनिया गांधी पक्षातील मुद्द्यांना सांभाळू शकल्या नाहीत. तर मनमोहन सिंग यांची संसदेतील अनुपस्थितीमुळे खासदाराशी त्यांच्या वैयक्तीक संबंधांवरही पूर्णविराम लागला, असा दावा प्रणवदा यांनी आपल्या पुस्तकामध्ये केला आहे.
माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचं निधन ऑगस्ट महिन्यात झालं. त्यांनी २०१४ मध्ये झालेल्या काँग्रेसच्या पराभवाला काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना जबाबदार धरलं आहे. तसंच २००४ मध्ये प्रणव मुखर्जी यांच्याकडे पंतप्रधान पदाची धुरा सोपवली असती तर २०१४ मधील लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसला पराभव पाहावा लागला नसता असं काही नेत्यांचं मत होतं, असा दावा प्रणव मुखर्जी यांनी आपलं पुस्तक ‘द प्रेसिडेन्शिअल ईयर्स’मध्ये केला आहे. मुखर्जी यांनी निधनापूर्वी हे पुस्तक लिहिलं असून रूपा प्रकाशन द्वारे ते जानेवारी महिन्यात प्रकाशित करण्यात येणार आहे. या पुस्तकातील काही भाग सध्या समोर आला आहे. ३१ जुलै रोजी वयाच्या ८४ व्या वर्षी प्रणव मुखर्जी यांचं निधन झालं होतं. पुस्तकातील काँग्रेस संबंधातील त्यांनी केलेली टीका अशावेळी समोर आली आहे जेव्हा काँग्रेसमधीलच काही अंतर्गत वाद समोर येत आहे. “माझ्या पक्षातील काही सदस्यांचं असं मत होतं की २००४ मध्ये जर पंतप्रधान असतो तर २०१४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसवर दारूण पराभव ओढवला नसता. परंतु या मताशी मी सहमत नाही. मी राष्ट्रपती पदी विराजमान झाल्यानंतर पक्ष नेतृत्वानं राजकीय दिशा गमावली. सोनिया गांधी पक्षातील प्रकरणं हाताळण्यास असमर्थ ठरत होत्या तर मनमोहन सिंग यांची संसदेतील मोठ्या अनुपस्थितीमुळे खासदासांशी त्यांच्या वैयक्तीक संबंधांवरही पूर्णविराम लागला,” असा दावा प्रणव मुखर्जी यांनी केला आहे.
या पुस्तकात पश्चिम बंगालच्या एका गावात प्रणव मुखर्जी यांनी घालवलेल्या बालपणापासून ते राष्ट्रपतीपदापर्यंतच्या प्रवासाचं वर्णन करण्यात आलं आहे. रूपा प्रकाशनद्वारे हे पुस्तक प्रकाशित करण्यात येत असून जानेवारी २०२१ मध्ये जगभरात हे पुस्तक उपलब्ध असेल असंही प्रकाशकांकडून शुक्रवारी सांगण्यात आलं.