नवी दिल्ली (वृत्तसंस्था) राज्यातील सर्व महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच लढण्याची घोषणा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. नाना पटोले यांनी आज दिल्लीत जाऊन राहुल गांधी यांची भेट घेतली. स्वबळावर निवडणूक लढण्यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी हिरवा कंदील दाखवल्याची माहिती नाना पटोले यांनी दिली.
विधानसभा निवडणुकीला अजून वेळ आहे. तीन वर्ष बाकी आहे. मात्र, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढेल. सरकार आणि संघटना या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत. त्याला सर्व पक्षांनी मान्यता दिली आहे. त्यामुळे हा वाद संपलेला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढणार आहे, यात काही वादच नाही, असं नाना पटोले म्हणाले.
आज राहुल गांधी यांच्याशी चर्चा झाली. यावेळी केसी वेणुगोपलही उपस्थित होते. महाराष्ट्रात आज जी काय स्थिती आहे. इतर पक्षांची. त्यात काँग्रेसचा बेस सर्वाधिक आहे. त्यामुळे काँग्रेसचा बेस नियोजनबद्ध कसा वाढवायचा त्यावर सखोल चर्चा या बैठकीत झाली, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटले. इतर केंद्रीय मंत्र्यांना भेटले. त्याकडे तुम्ही कसं पाहता, असा सवाल त्यांना करण्यात आला. त्यावर, ही त्यांच्या पक्षाची अंतर्गत गोष्ट आहे. त्यांनी कुणाला भेटावं किंवा भेटू नये हा त्यांचा निर्णय आहे. सध्या मोदी सर्व जनतेची हेरगिरी करत आहे. लोकांच्या प्रायव्हसीला धोका पोसवण्याचं काम मोदी आणि भाजप करत आहे. काँग्रेस हेरगिरी करण्याचं काम करत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.
राहुल गांधी महाराष्ट्राचा दौरा करणार
काँग्रेस नेते राहुल गांधी महाराष्ट्राचा दौरा करणार असून नागपूर, मुंबई आणि औरंगाबादमध्ये रॅली करणार असल्याची माहिती एच के पाटील यांनी दिली.