जयपूर (वृत्तसंस्था) राजस्थान मधील शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. या निवडणुकीत काँग्रेसने बाजी मारली आहे. तर चक्क भाजपा तिसऱ्या स्थानकावर फेकला गेला आहे. दरम्यान, राजस्थानमधील ५० शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी ११ डिसेंबर रोजी मतदान झाले होते.
काँग्रेसने एकूण ६२० प्रभागांमध्ये विजय मिळाला आहे. तर भाजपला ५४८ प्रभागात विजय मिळाला. भाजपपेक्षा अधिक प्रभागांमध्ये अपक्षांनी बाजी मारली अपक्ष उमेदवारांना ५९५ प्रभागात विजय मिळाला. एकूण १७७५ प्रभागांमध्ये ही निवडणूक झाली होती. निवडणूक आयुक्त पी. एस. मेहरा यांनी सांगितले की, ११ डिसेंबर रोजी पन्नास स्थानिक स्वराज्य संस्थासाठी मतदान झाले होते. यामध्ये एकूण ७९.९०% मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. या निवडणुकीची मतमोजणी रविवारी संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मुख्यालयामध्ये झाली. या मतमोजणीत एकूण १७७५ प्रभागाच्या मतमोजणीत काँग्रेसला ६२० तर भाजपाला ५४८ ठिकाणी विजय मिळाला. बसपाला ७, सीपीआयला २, आरएलपीचा एक आणि ५९५ अपक्षांना विजय मिळाला. दरम्यान, या निवडणुकीत काँग्रेसला मिळालेल्या विजयानंतर मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले. आपल्या ट्विटमध्ये गहलोत म्हणाले की, नगरपालिका आणि नगर परिषद निवडणुकीत विजयी झालेल्या सर्व उमेदवारांना हार्दिक शुभेच्छा. काँग्रेस पक्षावर विश्वास ठेवून काँग्रेसला विजय केल्याबद्दल मी राज्यातील जनतेचे आभार मानतो.