नवी दिल्ली (वृत्तसंस्था) दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज पत्रकार परिषद घेतली. दिल्लीची परिस्थिती खूपच गंभीर आहे. गेल्या २४ तासांमध्ये २४ हजार रुग्णांची नोंद झाली आहे. दिल्लीची आरोग्य व्यवस्था तणावाखाली आहे असं अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं आहे. दिल्लीमध्ये आज रात्रीपासून (सोमवार -१९ एप्रिल) ते पुढील सोमवारपर्यंत (२६ एप्रिल) लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
देशाच्या राजधानीमध्ये कोरोनाची चौथी लाट आली आहे. नवी दिल्लीतील आरोग्य यंत्रणा कोलमडली नाही मात्र, आरोग्य यंत्रणेच्या क्षमतेएवढे रुग्ण आढळत आहेत. या परिस्थितीमुळं नवी दिल्लीमध्ये पुढील आठवडाभर लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेतला आहे. नवी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्ली सध्या कोरोना विषाणू संसर्गाच्या चौथ्या लाटेला तोंड देत आहे. राज्यात २५ हजार कोरोना रुग्ण आढळत आहेत. या रुग्णसंख्या आणि दिल्लीची आरोग्य यंत्रणा जवळपास सारखी आहे. यामुळं यंत्रणेवर ताण आला आहे. सरकारकडून आरोग्य यंत्रणा कोलमडली जाऊ नये यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत, असं अरविंद केजरीवाल म्हणाले. नवी दिल्लीत गेल्या २४ तासात २३ हजार ५०० रुग्ण आढळले आहेत. रुग्णवाढीचा असाच वेग राहिला तर दिल्लीमध्ये कोरोना रुग्णांसाठी बेड कमी पडू शकतात, असं केजरीवाल म्हणाले.
अरविंद केजरीवाल यांनी पुढील सहा दिवसात आरोग्य यंत्रणा बळकट करणार असल्याचं सांगितले. येत्या सहा दिवसात बेडची संख्या वाढवली जाईल. लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये ऑक्सिजन, औषधे यांची व्यवस्था करणार आहोत. सर्व दिल्लीकरांनी २६ एप्रिलपर्यंत लावलेल्या लॉकडाऊनमध्ये सहकार्य करावं. दिल्लीला सहकार्य केल्याबद्दल केंद्र सरकारचं आभार असंही केजरीवाल म्हणाले.
अरविंद केजरीवाल यांनी स्थलांतरीत मजुरांना हात जोडून विनंती केली. यावेळी हा केवळ सहा दिवसांचा लॉकडाऊन लावत आहोत, दिल्ली सोडून जाऊ नका, अशी विनंती केली आहे. नवी दिल्ली सरकार तुमची काळजी घेईल, असं अरविंद केजरीवाल म्हणाले.
अत्यावश्यक सेवा, खाद्य पदार्थ पुरवणाऱ्या सेवा, वैद्यकीय सेवा सुरु राहतील. लग्न समारंभामध्ये ५० लोकं उपस्थित राहू शकतात, त्यासाठी वेगळे पास देण्यात येणार आहेत. अधिकारी सविस्तर सूचना जारी करतील, असं अरविंद केजरीवाल म्हणाले.