मुंबई (वृत्तसंस्था) भारतातील सर्वाधिक कोरोना प्रकरणं महाराष्ट्रात आहेत. देशातील सर्वाधिक कोरोना प्रकरणं असलेल्या जिल्ह्यांमध्ये सर्वात जास्त जिल्हे हे महाराष्ट्रातीलच आहेत. सर्वात जास्त कोरोना रुग्ण असलेल्या देशातील १० पैकी ९ जिल्हे एकट्या महाराष्ट्रातच आहेत म्हणजे जवळपास एक चतुर्थांश भाग कोरोनाने व्यापला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे.
केंद्र सरकारने देशातील अशा दहा जिल्ह्यांची यादी जारी केली आहे, जिथे कोरोनाची सर्वात जास्त प्रकरणं आहेत. यामध्ये महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील जिल्हे आहेत. दहापैकी नऊ जिल्हे तर फक्त महाराष्ट्रातीलच आहेत तर कर्नाटकातील फक्त एका जिल्ह्याचा समावेश आहे.
कोरोना रुग्णांमध्ये देशातील टॉप १० जिल्ह्यांत महाराष्ट्रातले कोण-कोणते जिल्हे?
जिल्हा कोरोनाचे अॅक्टीव्ह रुग्ण
पुणे ४३ हजार ५९०
नागपूर ३३ हजार १६०
मुंबई २६ हजार ५९९
ठाणे २२ हजार ५१३
नाशिक १५ हजार ७१०
औरंगाबाद १५ हजार ३८०
नांदेड १० हजार १०६
जळगाव ६ हजार ८७
अकोला ५ हजार ७०४
महाराष्ट्रात पुणे, नागपूर, मुंबई, ठाणे आणि नाशिक हे टॉपमध्ये आहेत. याच जिल्ह्यांमध्ये कोरोनाची प्रकरणं झपाट्याने वाढत आहेत. शिवाय देशात दोन राज्यांनीच चिंता वाढवली आहे. महाराष्ट्रासह पंजाब राज्यांमध्येही कोरोनाची सर्वात जास्त रुग्ण आहेत. या दोन्ही राज्यांतील टॉप पाच जिल्ह्यांचा विचार करताही पुणे, नागपूर, मुंबई, ठाणे आणि नाशिक हे टॉपवर आहेत. देशात दररोज नव्या रुग्णांची सर्वाधिक नोंद ही महाराष्ट्र राज्यातच होत आहे. महाराष्ट्रात दररोज २५ ते २८ हजाराच्या घरात नव्याने कोरोनाग्रस्तांची भर पडत आहे. महाराष्ट्राबरोबरच पंजाब, मध्य प्रदेश, गुजरातमध्येही कोरोनाचा प्रसार वाढू लागला आहे. महाराष्ट्रात नागपूर आणि बीड जिल्ह्यात लॉकडाऊनही लागू आहे, तसंच मुंबईसह अनेक शहरं आणि जिल्ह्यांमध्ये कोरोनासंबंधातले निर्बंध कडक करण्यात आले आहेत.