नवी दिल्ली (वृत्तसंस्था) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर आपला लोकसभा मतदारसंघ असलेल्या वाराणसीतील डॉक्टरांशी संवाद साधला. डॉक्टरांशी बोलताना ‘कोविडविरुद्ध सुरू असलेल्या या लढाईत आपण आपल्या जवळच्या अनेकांना गमावावं लागलंय’, असं म्हणताना ते भावूक झाले. कोरोनात जीव गमावलेल्या श्रद्धांजली वाहताना त्यांनी एक आवंढाही गिळला.
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “मी काशीचा सेवक या नात्याने सर्व काशीवासियांचे आभार मानतो. विशेष करुन आमचे डॉक्टर्स, नर्स आणि आरोग्य कर्मचारी यांनी जे काम केलंय, ते अतुलनीय आहे. या व्हायरसने आपल्या जवळच्या व्यक्तींना आपल्यापासून हिरावलं. मी त्या सर्वांना श्रद्धांजली वाहतो. त्यांच्या कुटुंबीयांप्रती सहानुभूती व्यक्त करतो”
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत आपण लसीच्या सुरक्षेकडेही लक्ष दिलं आहे. लसीच्या संरक्षणामुळे फ्रंटलाईन वर्कर्स सुरक्षित आहेत. हेच सुरक्षाकवच आपल्याला प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवायचं आहे. आपला नंबर आल्यानंतर प्रत्येकाने लस टोचून घ्यावी. लस ही प्रत्येकाची जबाबदारी असून पात्र असणाऱ्या प्रत्येकाने लस घ्यावी असं आवाहन मोदींनी केलं.
‘जहाँ बीमार, वही उपचार’
‘जहाँ बीमार, वही उपचार’ हाच आता आपला मंत्र असेल. जितके आपण लोकांजवळ उपचार घेऊन जाऊ तितका आरोग्य व्यवस्थेवरचा ताण कमी होण्यास मदत होईल, असंही पंतप्रधानांनी म्हटलंय. सोबतच, गेल्या काही दिवसांपासून काळी बुरशी ही एक नवी समस्या आपल्यासमोर उभीर राहिलीय. याला तोंड देण्यासाठी आवश्यक व्यवस्था तयार करण्यावर लक्ष देणं आवश्यक असल्याचंही त्यांनी म्हटलं.