मुंबई (वृत्तसंस्था) मुंबईतल्या पत्राचाळ प्रकरणी ईडीने शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना चौकशीसाठी समन्स बजावले होते. गेल्या चौकशीत गैरहजर राहिल्यानंतर ते आज ईडी चौकशीसाठी हजर राहणार आहेत.
आज संजय राऊत यांनी ट्विट करत यांची माहिती दिली आहे. आज दुपारी 12 वाजता मी ईडी कार्यालयात हजर होणार आहे. मला बजावलेल्या समन्सचा मी आदर करतो आणि तपास यंत्रणांना सहकार्य करणं हे माझे कर्तव्य आहे. मी शिवसेना कार्यकर्त्यांना ईडी कार्यालयात जमू नये, असं आवाहन करतो. मला बजावलेल्या समन्सचा मी आदर करतो आणि तपास यंत्रणांना सहकार्य करणे हे माझे कर्तव्य आहे. मी शिवसेना कार्यकर्त्यांना ईडी कार्यालयात जमू नये, असे आवाहन देखील राऊतांनी कार्यकर्त्यांना केले आहे. ईडीने 28 जून रोजी संजय राऊत यांना चौकशीला हजर राहण्यासाठी समन्स बजावलं होतं. पण त्यावेळी त्यांनी ईडीकडे वेळ वाढवून मागितला होता. ईडीने मागितलेली सर्व कागदपत्रे सादर करण्यासाठी संजय राऊत यांनी 14 दिवसांची मुदत वाढवून मागितली होती. ईडीने ही चौकशीसाठी हजर राहण्यासाठी त्यांना 14 दिवसांची मुदतवाढ दिली.
जाणून घ्या…नेमकं काय आहे पत्राचाळ प्रकरण ?
पत्राचाळ जमीन घोटाळा 1,034 कोटी रुपयांचा आहे. मुंबईमधील गोरेगाव येथील पत्राचाळीत महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाचा (म्हाडा) भूखंड आहे. ईडीच्या आरोपानुसार, प्रवीण राऊत यांच्या गुरू आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीला ही चाळ विकसित करण्याचे काम देण्यात आले होते. मात्र, त्यांनी या जागेचा काही भाग खासगी बिल्डरांना विकला, असा आरोप आहे. प्रवीण राऊत यांच्यावर पत्राचाळमध्ये राहणाऱ्या नागरिकांची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. गुरु आशिष कन्स्ट्रक्शनला पत्रा चाळचे 3 हजार फ्लॅट बांधकाम करायचं होतं, त्यापैकी 672 फ्लॅट येथील भाडेकरूला द्यायचे होते. उर्वरित फ्लॅट म्हाडा आणि विकासक यांच्यात वाटून घ्यायची होती. परंतु, 2010 मध्ये प्रवीण राऊत यांनी गुरू आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीचे 258 टक्के शेअर एचडीआयएलला विकले. यानंतर 2011, 2012 आणि 2013 मध्ये भूखंडाचे अनेक भाग इतर खाजगी बिल्डर्सना हस्तांतरित करण्यात आले.